औरंगाबाद – aurangabad
फायनान्स कंपनी (Finance Company) मध्ये काम करणार्या 25 वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने सोशल मीडियावर (suicide) ‘सुसाईड, गुडबाय’ असा स्टेटस ठेऊन घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दि.20 ऑक्टोबर रोजी सकाळी भावसिंगपुरा भागातील पेठेनगरात उघडकीस आली. नागेश मधुकर तुरूकमाणे (25, ह.मु.पेठेनगर, मूळगाव- कहागरगाव जि. हिंगोली) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
मूळचा हिंगोली जिल्ह्यातील नागेश तुरुकमाणे याचे एमए पर्यंतचे शिक्षण झालेले होते. तो लहानपणा पासून आत्याकडे पेठेनगर भागात राहत होता. आत्या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. नागेश एकटाच घरी होता. आत्याने मंगळवारी रात्री मुंबईहून रेल्वेने औरंगाबादेत आल्या. तेव्हा त्यांनी नागेशला फोन करून रेल्वेस्टेशनला घेण्यासाठी ये असे सांगितले. मात्र, नागेशने मी थकलो आहे असे म्हणत नकार दिला. त्यामुळे आत्या नातेवाईकांच्या घरी झोपल्या. मध्यरात्री तीनच्या सुमारास सोशल मीडियावर नागेशने सुसाईड गुडबाय असा स्टेटस ठेऊन मावस भावाला मेसेज केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. पहाटे झोपेतून उठल्यावर मावस भावाने नागेशचा मेसेज पहिला व आत्याला याबाबत कल्पना दिली. आत्याने तातडीने घर गाठले. आत पाहिले असता नागेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाईकांच्या मदतीने त्याला तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.