औरंगाबाद – Aurangabad
लग्नाच्या वरातीत नाचताना रात्रीच्या अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना चिकलठाणा हद्दीत येणाऱ्या कच्ची घाटी परिसरात घडली. सचिन गोरखनाथ आरणे (२५, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर, ह.मु. चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सचिन आरणे याचा मित्र अर्जुन राजपूत याचे रविवारी (२१ फेब्रुवारी) कच्चीघाटी येथे लग्न होते. या लग्न सोहळ्यासाठी सचिन मित्रांसह कच्ची घाटी येथे गेला होता. लग्न रात्री उशिरा होते. ज्या मंदिरात वऱ्हाडी उतरले होते, तेथून जवळच विहीर होती. रात्री नवरदेवाच्या मित्रांनी मिरवणूक काढली होती, डीजेच्या तालात नाचत असताना अंधारात विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे सचिनचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सचिनला वाचविण्याचा प्रयत्न केला. विहिरीत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तसेच, तो पाण्यात बुडाला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.