औरंगाबाद - Aurangabad
कोरोना (corona) संसर्गाची स्थिती नियंत्रणात आलेली असताना औरंगाबाद शहरात आता (Dengue, Chikungunya and Malaria) डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया या आजारांनी डोके वर काढले आहे. त्याशिवाय तापाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. सप्टेंबरच्या तीस दिवसांत डेंग्यूचे ४८ रुग्ण आढळून आले, तर डेंग्यू संशयित ९७ रुग्ण विविध रुग्णालयांमधून उपचार घेत आहेत. व्हायरल इनफेक्शनमुळे तापाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. या सर्व प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेसमोरचा ताण वाढला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. शहरातील सुमारे ५५० दवाखान्यांची पालिकेकडे नोंद आहे. यापैकी बहुतेक दवाखान्यांमध्ये तापाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातच डेंग्यूच्या रुग्णांनी चिंतेत भर टाकली आहे. सप्टेबर महिन्यात डेंग्यू पॉझिटिव्ह असलेले ४८ रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. त्याशिवाय डेंग्यू संशयित ९७ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
तापाच्या रुग्णांची संख्या सध्या खूप आहेत अशी माहिती त्यांनी दिली. करोना संसर्गाच्या आजारापासून तापाच्या रुग्णाची करोना चाचणी केली जात आहे. त्याच बरोबर मलेरिया, टायफाईड या आजाराच्या चाचण्या देखील आता केल्या जात आहेत, पण ताप आलेल्या बहुतेक रुग्णांच्या कोरोनासह मलेरिया, टायफाईड आदी चाचण्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे नेमके तापाचे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन-चार दिवस ताप उतरत नसल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.