औरंगाबाद – Aurangabad
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी मृत्यू दरात मात्र फरक पडलेला नाही. मृत्यूदर आहे तसाच आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार रोज सरासरी दहा रुग्णांचा मृत्यू होत आहे.
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मार्च-एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. रोज आठशे ते हजार रुग्ण आढळून येऊ लागले. एप्रिलमध्ये तर एका दिवशी १९०० रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे चिंता वाढली होती. पण मे महिन्यात रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. सध्या रोज सव्वाशे-दीडशे रुग्ण आढळून येत आहेत.
रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे महापालिकेने कोव्हिड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहेत.रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी मृत्यू दरात मात्र घट झाल्याचे चित्र नाही. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भागापेक्षा शहराचा मृत्यूदर कमी होता. आता शहरातील मृत्यूदर वाढला आहे. पालिकेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.३ टक्के आहे, तर शहरातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दररोज सरासरी दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.