नाशिक । प्रतिनिधी
एनआयओएसने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंबंधी मोठा निर्णय घेतला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर एनआयओएसने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयओएसने नोटिस जारी केली आहे. यात असे म्हटले आहे की, सेकंडरी कोर्सेस (इयत्ता दहावी) च्या लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
असेसमेंट आणि निकाल तयार करण्यासाठी एनआयओएस लवकरच योग्य निकष तयार केले जातील. जे विद्यार्थी निकालावर समाधानी नसतील, त्यांनी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल.
इयत्ता बारावीची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पुढील आदेशांपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. 20 जून रोजी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यांनतर परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखांची माहिती परीक्षा सुरू होण्याआधी 15 दिवस दिली जाईल असे, सांगण्यात आले आहे.