नाशिकच्या नाट्यगृहांतही आता ‘नो ट्रिंग ट्रिंग’?

नाशिकच्या नाट्यगृहांतही आता ‘नो ट्रिंग ट्रिंग’?

नाशिक। गणेश सोनवणे
मुंबई महापालिकेने आपल्या नाट्यगृहात जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुढील एक महिन्यात मुंबईकर नागरिक, नाट्यसंस्था,आयोजक आणि निर्मात्यांकडून हरकती आणि सूचना मागविल्या जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णयं घेतला जाणार आहे. नाटक सुरु असताना प्रेक्षकांपैकी कुणाचातरी मोबाईल वाजणे आणि त्यामुळे कलाकारांबरोबरच इतर प्रेक्षकांचाही रसभंग होणे हे प्रकार सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊनच मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयावर नाशकातील रंगकर्मी, नाट्यदिग्दर्शक, कलावंत व नाट्यरसिकांचे मत जाणून घेतले असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून मुंबई प्रमाणे नाशकातील नाट्यगृहांमध्येही महापालिकेने मोबाईल जॅमर बसवायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नाशिकमधे ‘नॉक नॉक सेलिबे्रटी’ नाटकाचा प्रयोग सुरु असताना मोबाईलची रिंग वाजल्याने नाटकातील कलाकार सुमीत राघवन याने प्रयोग थांबवला होता. त्यातंतर सभागृहात मोबाईल सायलेंट करण्याची आठवण व्हावी यासाठी कालिदास कलामंदिरात मोबाईल सायलन्टचा बोर्ड देखील लावण्यात आला मात्र तरीही हे प्रकार थांबले नाही.

नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकरांचा रसभंग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे मुंबईच्या धरर्तीवर नाशिकधील कालिदास कलामंदीर व पसानाट्यगृहातही जॅमर बसवण्याची गरज असल्याची भावना येथील नाट्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

अतिशय महत्वाचा निर्णय आहे. अगदीच काही महत्वाचे काम असेल तर प्रेक्षक मध्यातंरात फोनकॉल करु शकतो. खरतंर असा निर्णय प्रेक्षंकावर लादणे दुर्देेवी आहे. मात्र प्रेक्षकाचे हरपत चाललेलं समाजभान पाहाता हा निर्णय घेणं गरजेचं होतं. प्रेक्षकाला नाटकापेक्षा मोबाईल महत्वाचा वाटत असेल तर तो जाम केलेलाच बरा.
-दत्ता पाटील. नाट्यलेखक

नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्यास त्याचा त्रास प्रत्येक कलाकाराला होतोच. त्यामुळे जॅमर लावण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे मुंबईच्या धरर्तीवर नाशिक महानगरपालिकेने देखील किमान कालिदास कलामंदिरात व पसानाट्यगृहात जॅमर लावायला हवे.
-राजेश जाधव, राज्यनाट्यस्पर्धा समन्वयक

अनेकदा मोबाईल सायलंट करण्याची विनंती करुनही लोक ऐकत नाही. त्यांना चांगल सांगायला गेलो की वाद घालत बसतात. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो याची जाणीवच काही प्रेक्षकांना नसते. त्यामुळे जॅमर लावलेले कधीही चांगले. मुंबई पाठोपांठ नाशकातही तातडीने हा निर्णय घ्यायला हवा.
-रवींद्र ढवळे – ज्येष्ठ रंगकर्मी

प्रयोगादरम्यान वाजणारे मोबाईल , बेशिस्त पद्धतीने प्रेक्षकांचे फोनवर बोलणे यामुळे कलाकारांचा रसभंग होतो. हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने केलेला विचार योग्य आहे. कलाकार जीव तोडून आपली कला सादर करतो पण प्रेक्षकाला त्याची जाण नसते. नाशिकातही याची गरज असून केवळ नाट्यगृहातच नव्हे तर सर्वच महत्वाच्या सांस्कृतिक दालनात जॅमर बसवण्याची गरज आहे.
-प्रंशात हिरे- नाट्यदिग्दर्शक

मुंबई महानगरपालिका घेत असलेला निर्णय योग्य आहे. नाशिक मधेे देखील नाट्यप्रयोगादरम्यान घडलेले प्रकार पाहाता येथेही नाट्यगृहांत जॅमर बसवण्याची गरज आहे. अनेकदा फोन आला की लोक बोलता बोलता नाटक अर्धवट सोडून निघून जाता किंवा मोठ्या आवाजात तेथेच बोलत बसतात. जातात. यामुळे कलाकारांचे लक्ष विचलित होते. हा त्या कलाकाराबरोबरच रंगभूमीचाही अपमान आहे.
-आकाश कंकाळ – नाट्यकलावंत

मला वाटते नाटकच नव्हे तर गाण्याचा, नृत्याचा कार्यक्रम किंवा चित्रपट सुरु असताना मोबाईल वाजताच कामा नये. तेवढी सुजाणता प्रेक्षकांनी दाखवायला हवी मात्र तसे होत नाही. वारंवार सूचना करुनही लोक मोबाईल बंद करत नाही. मग अशा वेळी जॅमर हा मला योग्य पर्याय वाटतो.
-शौनक जाखडी- प्रेक्षक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com