Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदरवर्षी 35 हजार पासपोर्टची मागणी; परदेशी जाण्यामध्ये नाशिककरांचा कल वाढला

दरवर्षी 35 हजार पासपोर्टची मागणी; परदेशी जाण्यामध्ये नाशिककरांचा कल वाढला

नाशिक । शिक्षण, नोकरी तसेच व्यावसायासाठी उपलब्ध होत असलेल्या परदेशी संधींमुळे नाशिककरांचा परदेशी जाण्याचा कल वाढत आहे. अशातच पासपोर्टसाठी कमी कागदपत्रे व ऑनलाईन पद्धती यामुळे नाशिकमधून दरवर्षी सरासरी 35 हजार पासपोर्टची मागणी होत असून यामध्ये दरवेळी वाढ होत आहे.

पासपोर्ट अपॉइंटमेंट मिळण्यापासून ते पोलिस व्हेरिफेकशनपर्यंत येणार्‍या अनेक अडचणींवर ऑनलाईन पद्धतीने मात केल्याने पासपोर्ट काढण्याकडे नाशिककरांचा कल वाढला आहे. पासपोर्ट काढणे म्हणजे एक आव्हान असते, अशी पासपोर्ट कार्यालयाची काही वर्षांपूर्वीपर्यंत ख्याती होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय ‘टीसीएस’च्या सहभागातून सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रांमुळे पासपोर्ट प्रक्रिया सुलभ झाली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांत अपॉइंमेंटची संख्या वाढविण्याबरोबरच कागदपत्रांमध्येही अनेक सवलती दिल्याने पासपोर्ट काढणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपॉइंटमेंट मिळण्याचा कालावधी घटल्यामुळे लोक तत्काळ ऐवजी दैनंदिन अपॉइंटमेंटला प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षात नाशिक विभागाकडे पासपोर्ट कार्यालयाकडे तब्बल 28 हजार लोकांनी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केले. यातील 26 हजार 506 नागरिकांना पासपोर्ट वितरित करण्यात आले. चालू वर्षी आतापर्यंत सुमारे 32 पासपोर्टची मागणी करण्यात आली होती. त्याची कागदोपत्री पुर्तता पुर्ण करून बहूतांश लोकांना पासपोर्ट मिळाले आहेत.

गेल्या काही वर्षांत परदेशात उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी जाण्याच्या संधी वाढल्या आहे. उच्च शिक्षण, नोकरीच्या मुलाखतीदरम्यानही अलीकडे पासपोर्टची विचारणा केली जाते. त्यामुळे विद्यार्थी आणि तरुण नोकरदार वर्ग गरज म्हणून पासपोर्ट काढून ठेवतो आहे. परदेश पर्यटनही अनेकांच्या आवाक्यात आल्याने लोक पासपोर्टची मागणी करीत आहे. परिणामी दरवर्षी पासपोर्टच्या अर्जांची संख्या वाढते आहे.

प्रतिष्ठचे लक्षण
परदेशी शिक्षण, खेळ व नोकरी याची अगामी काळातील नियोजन म्हणुन बहूतांश नागरीक पासपोर्ट काढून ठेवतात. परंतु आता आपल्याकडे पासपोर्ट असेण हे आता प्रतिष्ठेचेही लक्षण झाले आहे. अनेक नागरीकांनी केवळ जवळ पासपोर्ट असावा म्हणुन पासपोर्ट काढून ठेवले जात आहेत. तर अनेकांनी केवळ सर्वात मोठा रहिवाशी पुरावा म्हणून पासपोर्ट काढले आहेत. कोणत्याही कार्यालयात पासपोर्ट दिला तर इतर रहिवाशी पुराव्याची मागणी होत नाही.

प्रतिसाद वाढला
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे कमी केल्याने लोकांचा प्रतिसाद वाढला आहे. पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये वापरण्यात येणार्‍या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे तपासणीचा कालावधी घटला आहे. परिणामी पासपोर्टसाठी अपॉइंमेंट ते पोलिस व्हेरिफेकशनची प्रकिया सुटसुटीत झाली असून अल्पावधीत पासपोर्ट वितरित करण्यास यश आले आहे. परिणामी नागरीकांचाही मोठा प्रतिसाद वाढला असल्याचे पासपोर्ट अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या