नाशिक | प्रतिनिधी
स्वखर्चाने गोदावरी प्रदूषण खटला लढत आहेत,
पर्यावरण कायद्यांसंदर्भात जाहीर व्याख्याने,
मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ पॅनेल समुपदेशक,
पर्यावरण कायदे तज्ञ अशी ओळख.
मी मुळचा नाशिकचा. नाशिकरोड परिसरात माझं बालपण गेलं. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण तर पुढे अकरावी बारावी बिटको कॉलेजमध्ये पूर्ण केलं. आपण ज्या समाजात राहातो त्याचा अभ्यास केला पाहिजे या विचारातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. कायद्याचा अभ्यास एनबीटी लॉ कॉलेज आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून केला. आंतरराष्ट्रीय कायदा व लवाद मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
घरातल वातावरण कायमच मला स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन देणार आहे. वडील वकील आणि सामाजिक कामांमध्ये सक्रीय असल्यामुळे लहानपणापासून कायमच समाजभान आपोआप रुजलं. जेलरोडवरील सायट्रिक परीसराजवळ गोदाकाठ आहे. लहानपणी मित्रांसोबतच तिथे जायचं. नदीत पोहायचं आणि पाण्यात तासनतास खेळायचं हा सगळ्यात आवडता छंद होता. मला आठवतं, साधारपणे १९९३-९४ साल असेल तेव्हापासून नदीत खेळल्यानंतर आमच्या अंगाला खाज येणं सुरु झालं. पुढे पाण्याला वासही येऊ लागला.
पण नंतर शिक्षणाचा व्याप वाढला. दुनियादारी वाढली. गोदावरी काठावर जाणं इतिहास जमा झाल. दुसरीकडे आधीपासून नाटक, सिनेमा, लिखाण याचीही आवड होती. मग शिक्षण घेत असतांना दैनिकांच्या पुरवणीत लिखाण सुरु केलं. राजीव पाटील यांच्या सावरखेड एक गाव या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अॅड. उदय वारुंजीकर यांच्याकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. २०११ पासून स्वतंत्रपणे कामाची सुरुवात केली. मुंबई हायकोर्टातूनच वकीली करायची हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झालो. मुंबई आल्यानंतरही नाशिकशी नात कायमच राहीलं. सुट्टीच्या दिवशी नाशिकला येण होतं. त्यामुळे नाशिकचे प्रश्न, बदल नवीन नव्हते.
अशा प्रकारे पर्यावरणाशी संबंधित ठाण्यातल्या खाडीचा प्रश्न, कोस्टल रोड प्रोजेक्ट, नाशिकचे पाणी वाटप अशा अनेक खटल्यांचे काम माझ्याकडे आहे.
याशिवाय फौजदारी, नागरी, कॉर्पोरेट, आयपीआर, सेवा आणि प्रशासकीय, कामगार, पर्यावरण, घटनात्मक कायदे, खासगी आंतरराष्ट्रीय कायदा आणि व्यावसायिक लवादाशी संबंधित विषयांवर काम करत आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या वरिष्ठ पॅनेलवर नियुक्त असून महत्वपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडत आहे. ठाण्यातील अनाधिकृत होर्डींग प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने ठाणे शहरातील कोर्ट कमिशनर म्हणून माझी नेमणूक केली आहे.
मला तरुणांना आणि विशेष करून नाशिककरांना सांगावेसे वाटते की, गोदावरी नदी ही आपली ओळख आहे. या नदी काठावर आपले शहर वसले आहे. अनेक उद्योगव्यवसाय याच नदीमुळे नाशिकमध्ये आले आहेत. जिल्ह्याचे संपूर्ण अर्थकारण, आपले अस्तित्व याच नदीवर अवलंबून आहे. तेव्हा या नदीचे जतन, संवर्धन ही आपलीच जबाबदारी आहे. हे मान्य केले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गोदावरीचे प्रदूषण रोखले पाहिजे.