मुंबई | प्रतिनिधी
येत्या १ एप्रिलपासून पूर्वीप्रमाणेच सर्व आश्रमशाळांना बी.पी.एल. दराने अन्नधान्य पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी अध्यक्षांना दिली.
महाराष्ट्रातील आश्रमशाळा व वसतीगृहांना बी.पी.एल दराने अन्नधान्याचा पुरवठा करत होते. मागील वर्षी केंद्रसरकारच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळांनाच अन्नधान्य मिळणार अनुदानित आश्रमशाळांना मिळणार नाही असे पत्रक काढण्यात आले होते.
त्यामुळे महाराष्ट्रातील २२९० आश्रमशाळांमधील २ लाख २० हजार मुलांना सवलतीच्या दरात मिळणारे अन्नधान्य मिळत नव्हते. परिणामी अशा शाळांना बाजारभावाने धान्य खरेदी करावे लागत होते. केंद्रसरकारच्या या आदेशामुळे अनेक आश्रमशाळा अडचणीत आल्या होत्या. यासंदर्भात राज्य शासनाकडून पाठपुरावा करण्यात आला होता याबाबत केंद्रसरकारला निवेदन देण्यात आल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.