नाशिक । प्रतिनिधी
राज्यात निसर्ग वादळाने शेतीचे नुकसान, मच्छिमार बोटी व उत्पन्न साधनाचे नुकसान, घरांचे नुकसान हे मोठया प्रमाणात झाले आहे. याचे पंचनामे तातडीने करणे गरजेचे आहे. सिंधदुर्ग,रत्नगिरी, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, व अन्य जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जनतेच्या मालमत्तेला हानी पोचली आहे, अन्य जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट मदतीचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये शासनाने विनाविलंब द्यावेत अशी मागणी स्वराज इंडिया- महाराष्ट्रच्या वतीने अध्यक्ष ललित बाबर, सचिव प्रत्युष व प्रा.ओमप्रकाश कलमे, उपाध्यक्ष वंदना शिंदे यांनी केली आहे .
१) कोणतीही टक्केवारी न लावता वादळग्रस्तांना मदत करण्यात यावी.
२) शेतकरी ज्यांचे हातचे आलेले पीक नष्ट झाले त्यांना अन्नधान्य, फळबागा व भाजीपाला शेतकरी यांना एकरी पन्नास हजार रुपये देण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांनी बांधावर जाऊन पंचनामा करावा व त्याचे फोटो काढावेत, जे पुरावा म्हणून उपयोगात येतील.
३) याच काळात शेतमजूर कुटुंबे ज्यांचे घराचे नुकसान झाले असल्यास 50 हजार व घराचे नुकसान झालेले नसल्यास रु.दहा हजार तातडीची मदत देण्यात यावी.
४) छोटे व्यावसायिक व वृक्ष पडून ज्यांच्या वहानाचे नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी.
५) काही नागरिक या वादळात मृत झाले अशी माहिती मिळत आहे, वादळाने प्रभावीत होऊन मृत झालेल्या नागरिकांच्या कुटूंबांना रु.दहा लाखाचे अर्थसहाय्य देण्यात यावे.