अन्नदात्याला सलाम करत ‘किसान सन्मान दिन’ साजरा

नाशिक । प्रतिनिधी

आज करोनाच्या महामारीत सगळं जग घरात बसलेलं असताना त्याला अन्नपुरवठा करण्याचं अविरत काम शेतकरी करत आहे.सगळी वितरण व्यवस्था कोलमडून पडली असताना वितरणाची जवाबदारी सुद्धा जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी घेतली.यात अनेक शेतकरी करोना ग्रस्त झाले.पण जगाच्या पोशिंद्याने हे काम थांबवले नाही.म्हणून शनिवारी (दि१६) देशभर किसान सन्मान दिन साजरा करण्यात येत आहे ,अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

अखिल भारतीय किसान संघर्ष समिती व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आवाहन केल्याप्रमाणे सकाळी ९ वाजता स्वतःच्या अंगणात किंवा शेतात हातात अवजारे घेऊन , देशाचा तिरंगा ,अथवा संघटनेचा झेंडा घेऊन ‘ गर्व से कहो हम किसान है ‘आशा घोषणा दिल्या.यात लहान मुलं ही सहभागी झाले.एक बाजूला डॉक्टर , नर्सेस, पोलीस यंत्रणा लढतेय त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी प्रचंड तोटा सहन करून ही शेती करतोय .आपापली जवाबदारी चोख पार पडतोय.अन्न निर्मिती व वितरणाचं काम त्याने थांबवलेलं नाही.म्हणूनशेतकरी हा अन्नदाता योद्धा आहे.त्याचा सन्मान केला पाहिजे अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सुद्धा चिंचखेड ता.दिंडोरी येथील स्वतःच्या अंगणात ट्रॅक्टर व इतर शेती अवजारांसोबत किसान सन्मान दिन साजरा केला.

राजू शेट्टी म्हणतात त्याप्रमाणे शेतकरी हा अन्नदाता योद्धा आहे.प्रचंड नुकसान त्याचं कोरोनाच्या महामारीत झालं पण त्याने हार मानली नाही.जगाला जगवण्याचं अन्न देण्याचं खडतर व्रत त्याने अविरत चालू ठेवलं आहे.म्हणून या योध्याला आज किसान सन्मान दिन साजरा करून अनेकांनी सलाम केला.
– संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष – स्वाभिमानी शेतकरी संघटना