सातपूर । प्रतिनिधी
सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अन्नदान करणाऱ्या सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांच्या उपक्रमांना पूर्णविराम बसला असून यामुळे कष्टकरी गोर-गरीब जनतेचे हाल होऊ लागले असल्याचे चित्र आहे.
लॉक डाऊन च्या सुरुवातीच्या काळात शासनाद्वारे मिळणारे धान्य व विविध संस्थांच्या कडून मिळणारे अनुदान यामुळे कष्टकरी जनतेचे दिवस सुरळीत पार पडत होते सातपूर अंबड लिंक रोडवर सापडलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांपाठोपाठ सातपूर कॉलनी मध्ये नऊ बाधित आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते सातपूर कॉलनी मधील रुग्ण हे दाट वस्तीची आठ हजार वसाहत श्रीकृष्ण नगर वसाहत तसेच जाधव संकुल या परिसरात असल्याने संपूर्ण कॉलनी परिसर प्रतिबंधित झाले आहे .
या पार्श्वभूमीवर करोना सातपूरकरांच्या उंबऱ्यावर आल्याने उगाच धोका नको म्हणून बहुतांश मंडळांनी अन्नदान थांबवले प्रत्यक्षात गेल्या महिनाभरापासून अन्नदान सुरू असल्याने काही मंडळांचे आर्थिक गणित बिघडले होते तर सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी मात्र करोनाचा धोका लक्षात घेत अनुदानाला पूर्णविराम दिल्याचे समजते.
सुरुवातीच्या काळात मोठ्या संख्येने अन्नदान होत असल्याने कष्टकऱ्यांना फारशी चणचण जाणवली नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वच मंडळांनी अन्नदान थांबल्याने कष्टकऱ्यांची अडचण झाल्याचे दिसून येत आहे