नाशिक । प्रतिनिधी
उत्तर भारतात पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली असल्याने शेजारील राज्यात शितलहरीचा प्रभाव जाणवू लागला आहे. यामुळेच राज्यातील विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याने आणि किमान तापमान देखील खाली आले आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले असुन हेच ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसांपासुन नाशिक जिल्ह्यात असल्याचे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
काल विदर्भातील कमाल तापमान ३१ ते ३३ अंशापर्यत नोंदले गेले.उत्तर महाराष्ट्रात ३२ ते ३६ अंश असे कमाल तापमानांची नोंद झाली असुन नाशिक जिल्ह्यात ३२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
नाशिकला रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान १२ अंश सेल्सीअस असे नोंदविले गेले होते. त्यानंतर काल नाशिकला १६.२ अंश सेल्सीअस असे किमान तापमान नोंदविले गेले. अशाप्रकारे तापमानात बदला झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या चटक्यापासुन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात बदलेल्या वातावरणामुळे उन्हांच्या झळा कमी झाल्या असल्या तरी ढगाळ वातावरणामुळे पाऊसाची शक्यता वाढली आहे. विदर्भात ज्या प्रमाणे पाऊस झाला, तसा पाऊस झाल्यास शिल्लक द्राक्ष व पिकांचे नुकसान होंण्याची भिती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.