नाशिक | प्रशांत निकाळे .
नाशिककर सध्या सकाळीच गंगापूर रोड येथील शंकराचार्य सभागृह येथे रांगा लावतात. या रांगा काही योग वर्ग किंवा इतर कोणत्याही व्यायामासाठी नाही. तर, सेंद्रीय पद्धतीने उगवलेल्या भाज्या घेण्यासाठी ही गर्दी होत आहे. देशी भाजीपाल्यासोबतच विदेशी लाल कोबी आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांचे उत्पादन सेंद्रीय पद्धतीने घेत आहेत.
शेतातील थेट ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळत आहे. विक्रीसाठी व्यापारीमध्ये नसल्याने शेतकर्यांना ही दोन जादा पैसे मिळत आहे. ग्राहकांना देखील बाजारभावापेक्षा स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करात येत आहे. यामुळे शेतकर्यांचा नफा १५ ते २० टक्यांनी वाढला असून नाशिककरांना सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आहारासाठी मिळत आहे.
आठवड्यातील दुसर्या आणि तिसर्या रविवारी ही बाजारपेठ भरते. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बाजार सुरू असतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील प्रा. हेमराज राजपूत आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सुमारे १५० ते २०० शेतकरी ‘रोटरी ऑर्गेनिक बाजार’शी संलग्न राहून त्यांचा शेतमाल विकत आहेत.
असाच उपक्रम मुंबईत वडगाव सिन्नर येथील भागवत बालक यांच्या प्रयत्नातून सुरू आहे. नाशिकमधील शेतकरी गटाने ‘वसुंधरा सेंद्रीय शेतमाल संपादन शेतकरी गट’ या नावाने सुरू केलेल्या कृती संकल्पनेचे नेतृत्व करीत आहे. मुंबईत आठवड्यातून दोन ते तीन दिवस सेंद्रीय भाजीपाला बाजारपेठ ही संकल्पना राबवली जाणार आहे.
मागणी जादा आणि पुरवठा कमी अशी सद्यस्थिती आहे. सेंद्रीय बाजार संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
तुषार उगले, सदस्य रोटरी क्लब, चेअरमन ऑर्गेनिक बाजार.
चांगला नफा मिळतो
सेंद्रीय भाजी बाजारात टोमॅटो, कांदा, बटाटा, पालेभाज्या, कडधान्य विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्याचबरोबर ब्रोकोली, मशरूम, लेटूस भाज्यांचीदेखील विक्री करतो. बाजारात पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया केलेले घान्याचे तेल, मसाले, चटणी यासारख्या सेंद्रीय उत्पादनांचा पुरवठा केला जातो. व्यापारी व दलालांची साखळी नसल्याने चांगला नफा मिळतो.
बाजारपेठ उभारणे आणि त्यासाठी योग्य जागा देणे, यासाठी आम्ही शंकराचार्य न्यास यांना विनंती केली. त्यांनी ताबडतोब यासाठी होकार दिला. आता, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या सहाय्याने सुमारे १५० ते २०० शेतकरी त्यांच्या भाजीपाल्याची या ठिकाणी विक्री करतात.
प्रा. हेमराज राजपूत