अवकाळी बाधीत ५ लाख २६ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

अवकाळी बाधीत ५ लाख २६ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

नाशिक । प्रतिनिधी

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्यात सात लाख ७६ हजार शेतकर्‍यांना फटका बसला. बाधितांना मदत म्हणून शासनाकडून पहिल्या टप्प्यात प्राप्त १८१ कोटींचा मदत निधी अडीच लाख बाधितांचा खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून अद्याप दुसर्‍या टप्प्यातील मदत निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे अजूनही ५ लाख २६ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहे. शासनाच्या मदतीकडे ते डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टवरील पिके आडवी झाली. साधारणत: साडेसात लाख शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका बसला. द्राक्ष, डाळिंब बागासह मका, सोयाबीन, कांदा, भाजीपाला आदी पिकांची नासडी झाली. शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शासनाच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे झाले. भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटींची आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८१ कोटींचे अनुदान प्राप्त झाले.

बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार आणि खरीप पिकांसाठी 8 हजार रुपये मदत दिली जात आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी १७९ कोटी १४ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. ९८.७० टक्के निधी वितरित केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

बाधितांपैकी अडीच लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत जमा झाली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला दुसर्‍या टप्प्यातील मदत शासनाकडून अद्याप प्राप्त झाली नाही. अजूनही साडेपाच लाख बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहे. वरील मदत राज्यात राष्ट्रपतीशासन लागू असताना राज्यपालांनी केली होती.

मात्र, आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. तरीदेखील नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आले नाही. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे. दुसरीकडे आस्मानी संकट व शासनाकडून मदतीबाबात होत असलेला उशीर यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com