Friday, April 26, 2024
Homeनाशिककळवण : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानींचे तातडीने पंचनामे करून आदिवासी बांधवाना दिलासा...

कळवण : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानींचे तातडीने पंचनामे करून आदिवासी बांधवाना दिलासा द्यावा – आमदार नितीन पवार

कळवण – । प्रतिनिधी

कळवण तालुक्यावर करोनाचं संकट आले असताना अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसापासून थैमान घातल्यामुळे घरांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार नितीन पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करुन नुकसानीची माहिती घेत आदिवासी जनतेला दिलासा दिला. यावेळी आदिवासी बांधवानी नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी आमदार पवार यांच्याकडे केली.

- Advertisement -

आमदार नितीन पवार यांनी खडकी जयदर , करंभेळ (क), देसगाव, शिंगाशी, बंधारपाडा, भौती, मोऱ्याडुंब, तीळगव्हाण, धनोली, काठरेंदिगर व पुनंद खोऱ्यात दौरा करुन नुकसानग्रस्त ठीकाणी भेट देऊन पहाणी केली.घटनास्थळावरून सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, तहसीलदार बी ए कापसे, गटविकासधिकारी डी एम बहिरम यांच्याशी चर्चा करुन नुकसानीचे महत्व लक्षात आणून दिले व तात्काळ पंचनामे करुन आदिवासी बांधवाना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरांचे व शाळेचे पत्रे उडून घरांची पडझड झाली असून घरकुलाचे काम सुरु असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे शिवाय शेतात काढून ठेवलेला कांदा, शेतीपिकांचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील विविध भागांत गेल्या दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

खडकी जयदर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपल्याने त्यात आदिवासी बांधवाच्या घरांचे पत्रे कौल उडाले, जीवनावश्यक वस्तू भिजल्या व भिंती कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संसार उघडयावर पडला आहे.शिवाय शेतीमाल व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

शिंगाशी, बंधारपाडा, भौती, मोऱ्याडुंब, तीळगव्हाण, धनोली, काठरेंदिगर येथे घरावरील पत्रे उडाल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय शेतातील कांदा व कांदा चाळीतील कांदा भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. देसगावच्या शाळेचे नुकसान झाले असून करंभेळ(क) येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून धनोली येथे घरकुल कामांचे काम सुरु आहे तेथे देखील अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी बांधव पोपट लांडगे, पंडित लांडगे, बाळू बर्डे, बेबीबाई गांगुर्डे, मन्साराम धुळे, मंजीबाई धुळे, उत्तम धुळे, सुनिल गांगुर्डे, रोहिदास धुळे, उत्तम धुळे, लक्ष्मण धुळे, रतन लांडगे, प्रकाश भोये, चिंतामण भोये यांनी केली आहे. दरम्यान तलाठी व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी आदिवासी बांधवांच्या नुकसानीची पहाणी करुन पंचनामे केले असून नुकसानीचा अहवाल तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

आदिवासी पश्चिम पट्ट्यातील व पुनंद खोऱ्यातील आदिवासी बांधवांच्या घराचे व शेतमालाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असून नुकसान भरपाई देऊन आदिवासी बांधवाना दिलासा द्यावा त्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे.
-आमदार नितीन पवार ,कळवण

- Advertisment -

ताज्या बातम्या