नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यात दोन लाख शेतकर्यांनी पीक विमा काढला असून अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळावी, यासाठी एक लाख ८५ ंहजार शेतकर्यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, पीकविमा कंपन्यांकडून मदतीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. साधारणत: साडेसात लाख शेतकरी बाधित झाले. द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, भाजीपाला या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. शासनाकडून पहिल्या टप्प्यात अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी १८१ कोटी प्राप्त झाले, तर दुसर्या टप्प्यात ३९६ कोटींची मदत देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९६ हजार ३९३ शेतकर्यांनी पीकविमा काढला आहे. त्यापैकी सुमारे १ लाख ८५ हजार शेतकर्यांनी पिकविम्यासाठी ऑनलाईन सादर केल होते. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करतानाच पीकविमा काढलेल्या शेतकर्यांची माहिती गोळा करण्यात आली होती. नुकसानीची भरपाई मिळण्याचा प्रस्ताव कृषी विभागाच्या माध्यमातून संबंधित पीकविमा कंपनीकडे पाठविण्यात आलेला आहे.
परतु, कंपनीकडून नुकसान भरपाईबाबत अद्याप कोणत्याही हालचाली पहायला मिळत नाही. शेतकर्यांनी विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याची फारशी दखल न घेता कंपनी प्रतिनिधींकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून मदत मिळेल की नाही, याबाबत सांशकता व्यक्त होत आहे.