नाशिक । प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून १९१ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. तब्बल ५६ जनावरे दगावली आहेत. वादळाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. या ठिकाणी ६४ घरांची पडझड झाली. तर १८७ घरांचे अंशत : नूकसान झाले. पोल्ट्री फर्म व पाॅली हाऊसलाही तडाखा बसला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात आर्थिक नूकसान झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बुधवारी (दि.३) चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल ९९५ मिलीमीटर इतका तुफान पाऊस झाला. चक्रिवादळाचा जोर गुरुवारी कमी झालानंतर त्याने मागे सोडलेल्या खुणा ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नूकसानीचे पंचनाम्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय पंचनामे करण्यात आले.
चक्रिवादळाने जिल्ह्याला जोरदार तडाखा दिल्याचे चित्र नुकसानीच्या आकडेवारीहून पहायला मिळत आहे. ४० ते ५०किमी ताशी वेगाने वाहणारे वाहने व तडाखेबंद पाऊस यामुळे शेत पिक व शेतातून काढलेल्या मालाचे अतोनात नूकसान झाले. जिल्ह्यात १९१ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत.
सर्वाधिक नूकसान सिन्नर तालुक्यात १३८ हेक्टर व त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यात ३८ हेक्टरवरील पिके झोपली. पोल्ट्रीफर्म, पाॅलीहाऊस व कांदा चाळी जमीनोदोस्त झाल्या आहेत. तसेच गाई, म्हशी, बोकड, शेळ्या व मेंढया दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात ५६ जनावरे दगावली आहेत. बागलाणमध्ये सर्वाधिक पशुधनाचे नूकसान झाले असून या ठिकाणी ३८ जनावरे दगावली. करोना संकटामुळे अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी चक्रिवादळामुळे जवळपास उध्दवस्त झाला आहे.
घरांचे मोठया प्रमाणात नुकसान
जोरदार वारा व मुसळधार पाऊस यामुळे घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली. ६४ पक्की घरांचे नूकसान झाले आहे. तर १८७ कच्च्या घरांना वादळाचा फटका बसला.तर ७ झोपडयांचे नूकसान झाले. घरांचे छत व पत्रे उडणे, भिंत खचणे अशा स्वरुपाचे नूकसान झाले आहे.