महावितरणच्या ‘मिस्ड कॉल’ सुविधेला प्रतिसाद; चार हजार ग्राहकांनी नोंदविली तक्रार

jalgaon-digital
3 Min Read

नाशिकरोड । संजय लोळगे

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या 23 दिवसांत राज्यातील 53 हजार 160 वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर 1583 वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे. नाशिक परिमंडळातील 3 हजार 939 ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून तक्रार नोंदविली.

आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. लॉकडाऊन’ काळात ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे.

गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या 23 दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण 1 लाख 39 हजार 751 तक्रारी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे प्राप्त झाल्या. यापैकी 38 टक्के म्हणजे तब्बल 53160 तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तर 1583 तक्रारी ‘एसएमएस’ द्वारे नोंदविलेल्या आहेत.

देखभाल दुरूस्ती कामांना वेग

विद्युत यत्रणेच्या मान्सूनपुर्व देखभाल दुरूस्तीच्या कामांनी वेग घेतला असून नाशिक परिमंडळातील शहर विभाग 1 व 2 तसेच ग्रामीण भागात 70 टक्के कामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे. पावसाळ्यात वीजेच्या तारांवर झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होतो. भूमिगत व उघड्या तारांची दुरूस्ती तसेच वीज तारांना स्पर्श करणार्‍या झाडांच्या फांद्या छाटणे, विद्युत वाहिन्यांचा सर्व्हे करणे, लोंबकळणार्‍या तारा पुर्ववत करणे, इन्स्युलेटर बदलणे, रोहित्रांची तपासणी आदी कामे दरवर्षी मे महिन्यात केली जातात. पहिल्याच पावसात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. कारण वादळ व सोसाट्याचा वारा यामुळे उघड्या तारांवर झाडाच्या फांद्या पडतात, बर्‍याच ठिकाणी वृक्ष कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मेन फिडरवरून सप्लाय बंद केला जातो.

वीजेच्या खांबाजवळ वृक्ष लागवड करू नये. वीज तारांवर अडकलेल्या पतंगाच्या मांजामुळेही धोका निर्माण होतो. खांबावर लावलेले होर्डिंग्ज व फ्लेक्स पावसाळ्यात वादळवार्‍यामुळे उडतात व थेट वीज खांबांवर आदळतात. अशा वेळी वीज कर्मचार्‍यांना जोखीम घेऊन काम करावे लागते. सुरळीत वीज पुरवठ्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे.

विकास आढे, महावितरण जनसंपर्क अधिकारी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *