श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील काष्टी येथील कृत्रीम दुध व भेसळ प्रकरणी आता दुग्धविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातले आहे. येथे छापा टाकणारे अन्न सुरक्षा अधिकारही चौकशीच्या फेर्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारीउमेश राजेंद्र सूर्यवंशी अन्न व औषध प्रशासन, यांच्या पथकाने काष्टी येथे दूध भेसळ करणार्या वर छापा घातला असून भेसळयुक्त दूध नष्ट करत भेसळीचे पावडर साहित्य जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल करण्यात झालेली दिरंगाई यात मुख्य संशयित बाळासाहेब पाचपुते समोर आतनाही नंतर फरार झाला असल्याने या कारवाई कुठे पाणी मुरते आहे का याबाबत पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली यंत्रणा सजग केली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी हे श्रीगोंदा येथे कुणाकुणाला भेटले त्याच्या संपर्कात कोणी होते का याबाबत ची माहिती ना.विखे पाटील यांच्या यंत्रणे मार्फत गोळा केली जात असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
पाचपुते याना फरार होण्यासाठी संधी कशी मिळाली, त्यात गुन्हा दाखल होण्यासाठी लागलेला उशीर हा ही चर्चेचा विषय झाला होता. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी यांनी खुलासा केला असला तरी या प्रकरणात पाणी मूरत असल्याच अनेकांचे म्हणणे आहे.
मोक्का कारवाईची मागणी
भेसळ प्रकरणात ठोस कारवाईसाठी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी तहसील कार्यालय येथे अंदोलन सुरू केले आहे. दूध भेसळ करणारे रॅकेट उध्वस्त करण्यात यावे. दूध भेसळीचा मास्टरमाइंड शोधण्यात यावा., सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अधिकार्यास निलंबित करण्यात यावे अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.