नाशिक । प्रतिनिधी Nashik
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अजूनही कार्यक्रमाची पत्रिकाच जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पत्रिका बनवली की हरवली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे साहित्य रसिकदेखील संभ्रमात आहेत.
संमेलनासाठीची निश्चित रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सूतोवाच महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जाहीरपणे केले होते. त्यानंतर गत महिन्यात ते पुन्हा नाशिकला आल्यानंतरही त्यांनी लवकरच कार्यक्रम पत्रिका जाहीर करणार असल्याचे जाहीर केले, तरी प्रत्यक्षात अजूनही ती जाहीर झालेली नाही.
तसेच आता उद्घाटक हा राजकारणी नव्हे तर साहित्यिकच पाहिजे, अशी महामंडळाची भूमिका असल्याचे कोणत्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन करणार, त्याबाबत अद्यापही घोळ सुरूच आहे. उपलब्ध होऊ शकणार्या कुणाही साहित्यिकाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही, तेदेखील समजू शकलेले नसून निमंत्रितांच्या कवी संमेलनात कोणत्या मान्यवर कवींना निमंत्रित केले, त्या नावांबाबतही उलगडा करण्यात आलेला नाही.
पुढे ढकलले तरी काय फरक पडतो?
नियोजित साहित्य संमेलन करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द् करून करोनास्थिती निवळल्यानंतर आहे, त्या नियोजनानुसारच घ्यावे, असाही सूर काही साहित्यरसिक आणि साहित्यिकांकडून उमटत आहे. परिस्थिती जशी आहे, ती स्वीकारून चालणे कधीही योग्य असते, असे सल्ले देखील चर्चिले जात असून एखाद्या वर्षी नाही घेतले संमेलन तर काय फरक पडतो, असेही बोलले जात आहे. संमेलन रद्दच करा, कशाला संकटात पडता आणि दुसर्यांनाही पाडता अशी खोचक चर्चाही काही ठिकाणी होत आहे.