या दिग्दर्शकांच्या बॉलिवूडचा राजीनामा

अनुभव सिन्हा, हंसल मेहता, सुधीर मिश्रा यांचा बॉलिवूडला रामराम
या दिग्दर्शकांच्या बॉलिवूडचा राजीनामा

मुंबई - Mumbai

गेल्या काही दिवसांपासून हिंदी इंडस्ट्रीत मोठे वाद होऊ लागले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हा वाद उफाळून आला. यात अनेक कलाकारांनी भाग घेतला आहे. कंगना राणौतने सुशांतच्या घटनेचा आधार घेत बॉलिवूडमध्ये कसा नेपोटिझम आहे, हे सांगितलं. ते सांगतानाच तिने काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर या अभिनत्रींनाही या वादात ओढलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटला. आता मुल्क, थप्पड, रा-वन, आर्टिकल -१५ असे सिनेमे देणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी थेट बॉलिवूडलाच रामराम ठोकायचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की, दिग्दर्शक हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीही या त्यांच्या निर्णयाला दुजोरा देत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी टिवटरवर पोस्ट करत सांगितलं की, ’मी आता बॉलिवूडचा राजीनामा देत आहे. त्याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा तो घ्या. असं सांगतानाच त्यांनी आपल्या टिवटर हँडलवर आपल्या नावानंतर नो बॉलिवूड असंही लिहिलं आहे. अर्थात ही पोस्ट आल्यानंतर एकच गहजब झाला. बॉलिवूडचा राजीनामा म्हणजे, अनुभव सिन्हा सिनेमे बनवणार की, नाही असा प्रश्‍न अनेक नेटिझन्सनी विचारला. त्यावर आपण सिनेमे बनवण्यासाठीच इथे आलो. आपण सिनेमे बनवूच. पण त्याची पद्धत आता बदललेली असेल असंही सांगितलं. आता येत्या काळात कसे सिनेमे बनवणार ते मात्र काही काळानंतर कळेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

अनुभव सिन्हा यांचं टिवट आल्यानंतर दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीही अनुभव सिन्हा यांना पाठिंबा दिला. सिन्हा यांच्या पोस्टला रिटिवट करताना आपणही बॉलिवूडचा राजीनामा देत असून आता यापुढे आपण भारतीय सिनेमा भारतीय पद्धतीने गोष्ट सांगून बनवू असं सांगितलं आहे. ते सांगताना त्यांनी गुरुदत्त, सत्यजीत रे, राज कपूर, बिमल रॉय, मृणाल सेन यांच्या सिनेमांपासून प्रेरणा घेऊन इथे आलो होतो असं सांगितंल आहे. असे सिनेमे बनवण्यासाठी आम्ही इथे नेहमी असू असंही ते सांगतात.

अनुभव सिन्हा यांनी त्याची दखल घेतली. एकाचे दोन झाले असं त्यांनी टिवटकरून सांगितलं. त्यानंतर दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही अनुभव सिन्हा यांच्या पोस्टचा संदर्भ घेत.. बॉलिवूड सोडलं? ते आपल्या यादीत कधीच नव्हतं अशा आशयाचं विधान केलं आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे हिंदी इंडस्ट्रीतल्या मोठ्या तीन दिग्दर्शकांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. अर्थात हे तिघेही जण सिनेमे बनवणार आहेत. त्याची पद्धत काय असेल ते मात्र येत्या काळात कळेल. या तिघांनी एकामागे एक टिवट केल्याने नेटिझन्सचे डोळे विस्फारले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com