सार्वमत
नागपूर – मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. रविवारी जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
‘राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल सदस्य म्हणून कुणाची नेमणूक करायची याचा निर्णय घेण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल. मागील राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इच्छुक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल,’ अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
दरम्यान राज्यात करोनाचं संकट असताना दुसरीकडे राजकारणही तापायला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरुन राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह असताना विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे राज्य सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे. 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीतून विधान परिषदेवर कोण जाणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. यातच आता भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे विधान परिषदेला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आधीच इच्छुक असलेल्या अनेकांची अडचण होणार आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 21 मे रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुकीमुळे आता भाजपातील इच्छुकांची संख्या वाढत आहे. यात आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी राजकीय लढाई दिसणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली आहे. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.