Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कामगार ब्युरोच्या माध्यमातून भूमिपुत्रांना नोकरीची संधी – सुभाष देसाई

राज्यात कामगार ब्युरोच्या माध्यमातून भूमिपुत्रांना नोकरीची संधी – सुभाष देसाई

सार्वमत

मुंबई – महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार आहे. कामगार ब्युरोतर्फे राज्यातील उद्योगधंद्यांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पुरवण्यात येणार असून भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणार असल्याने स्थानिक तरूणांना याचा मोठा फायदा होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय श्रमिक त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असून, यात कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले आहे.

करोनामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही गेले महिनाभर परप्रांतीय श्रमिकांना सतत सांगत होतो जाऊ नका. तरीही ते गेले. मात्र, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ती स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल, असेही देसाई म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या