अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषद शाळा, तसेच अनुदानित शाळांमधील 4 लाख 54 हजार विद्यार्थ्यांना यंदापासून मोफत एकात्मिक पुस्तक संच वितरित करण्यात येणार आहेत. बालभारतीकडून पाठ्यपुस्तक संच तालुका पातळीवर वितरणास सोमवार (दि.22) पासून सुरू झाले आहे. तालुका पातळीवर पुरस्तकांचे संच पोहच झाल्यावर त्याठिकाणाहून ते 10 जूनपर्यंत सर्व शाळांना वाटप केले जाणार आहेत. दरम्यान, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट आदेश आलेले नसून ते आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
यंदा बालभारतीकडून नगर जिल्ह्यासाठी भाषानिहाय 4 लाख 53 हजार 879 विद्यार्थ्यांसाठी 5 लाख 13 हजार 175 पुस्तकांचे संच वाटप करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची व पुस्तकांची ही संख्या असून यंदापासून बालभारतीने या वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर हलके करण्यासाठी, तसेच गुणात्मक वाढीसाठी एकात्मिक संच तयार केले आहेत. त्याचे वाटप थेट बालभारतीकडून गटशिक्षणाधिकार्यांना केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ झाला आहे. सोमवारी नेवासा, राहुरी, पारनेर आणि अकोले या तालुक्याच्या ठिकाणी उशीरापर्यंत पुण्याच्या बालभारतीमधून पुस्तकांचे संच पोहच करण्यात आले आहेत.
उर्वरित तालुक्यात राज्य ते तालुका पातळी असे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जूनपासून तालुका पातळी ते शाळापातळीपर्यंत पुस्तकांच्या संचाचे वितरण करण्यात येणार आहे. यात पहिली ते सातवीसाठी एक ते चार भागांचे संच असून त्याला वहीची पाने जोडलेली आहेत. इयत्ता तिसरीसाठीचा भाग तिसरा सर्व जिल्ह्यासाठी एकच आहे. मात्र, याच इयत्तासाठीचे भाग एक, दोन, चार हे नगर जिल्ह्यासाठी वेगळे असतील. आठवीसाठी 1 ते 4 भाग असतील. याच इयत्तेसाठी 100 गुणांचे सुलभभारती असेल, असे एकूण पाच पुस्तक संच असतील. या इयत्तेसाठी जर 50 गुणांचा हिंदी व 50 गुणांचा संस्कृत विषय असेल त्यांच्यासाठी ती दोन जास्तीची पुस्तके असतील. त्यांना एकूण सहा पुस्तके मिळतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
विद्यार्थी व कंसात पुस्तक संचसंख्या
संगमनेर 52 हजार 965 (61 हजार 282), नगर 32 हजार 206 (36 हजार 297), नेवासे 42 हजार 99 (47 हजार 378), पाथर्डी 27 हजार 761 (32 हजार 16), पारनेर 28 हजार 264 (31 हजार 912), राहुरी 35 हजार 946 (40 हजार 723), कर्जत 26 हजार 779 (29 हजार 87), जामखेड 18 हजार 892 (21 हजार 174), कोपरगाव 33 हजार 172 (38 हजार 54), श्रीरामपूर 29 हजार 968 (33 हजार 810), अकोले 31 हजार 565 (35 हजार 169), श्रीगोंदे 33 हजार 839 (37 हजार 517), शेवगाव 28 हजार 563 (32 हजार 809) आणि राहाता 31 हजार 500 (35 हजार 947) असे आहेत.
प्रत्येक इयत्तेला फक्त पुस्तके
यंदापासून प्रत्येक इयत्तेला फक्त पुस्तके असणार आहेत. यात फक्त इयत्ता 3 साठी भाग 1, 2 आणि 4 नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र राहणार असून भाग 3 ते राज्यात सर्वत्र सारखेच राहणार आहे. तसेच इयत्ता आठवीसाठी हिंदी शंभर गुणांच असल्यास त्यासाठी सलभ भारती आणि अधिक चार पुस्ते असे पाच पुस्तेक राहणार असून याच इयत्ते 50 गुणांचे संस्कृत आणि 50 गुणांचे हिंद हे विषय असल्यास सुगम भारती आणि संस्कृत आणि अधिक चार असे सह पुस्तके राहणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.