अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळं पुढं ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राज्यात पार पडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. नगरसह राज्यातील जिल्हा परिषद गट गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
नगर पालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना पूर्ण झालेली असेल. राज्य निवडणूक आयोगाने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
असा असेल कार्यक्रम..
- गट आणि गण रचनेचे प्रारूप आयुक्तांकडे पाठवणे : 23 मे
- त्या आराखड्यांना आयुक्तांनी मंजुरी देणे : 31 मे 2022
- प्रारूप गट गण रचना प्रसिद्धी : 2 जून 2022
- प्रारूप रचनेवर आक्षेप : 8 जून 2022
- आक्षेपांवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूप देणे : 22 जून
- अंतिम गट, गण रचनेची प्रसिद्धी : 27 जून 2022
संगमनेरात सर्वाधिक सदस्य
नगर जिल्ह्यात पूर्वी 74 गट होते. तर गण होते. पण आता त्यात वाढ झाली आहे. आता या नव्या रचनेनुसार 12 ने वाढ होत 85 झेडपी सदस्य असतील तर 24 ने वाढ होत 170 पंचायत समिती सदस्य असतील. संगमनेरात 10 गट तर 20 गण असतील. अकोले, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि पारनेरात प्रत्येकी 6 गट, 12 गण असतील. श्रीरामपूर, शेवगाव-5 गट 10 गण, नेवासा 8 गट, 16 गण, शेवगाव, पाथर्डी आणि कर्जतमध्ये प्रत्येकी 5 गट तर 10 गणांची संख्य असणार आहे. श्रीगोंद्यात 7 गट, 14 गण तर नगरमध्ये 7 गट आणि 14 गणसंख्या असेल.