अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहरात आणि तालुक्यात शेतकरी, कष्टकरी यांना हेरून त्यांच्याकडून दीड हजार रुपयांची मागणी करत, कृषी विभागाकडून विविध शासकीय योजना मंजूर करून देतो, अशी बतावणी करून शेतकर्यांची फसवणूक करणार्या विरोधात अखेर झेडपीच्या कृषी विभागाने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे संबंधित तोतया विरोधात दहा ते बारा तक्रारी आल्यानंतर जिल्हा कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या सहीच्या पत्राव्दारे कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित तोतयाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारी कृषी विभागाकडे अशोक सोनवणे (हिंगणगाव, ता. नगर), प्रकाश सांगळे (आगरकर मळा, नगर), विठ्ठल कुलांगे (रा. राळेगण म्हसोबा, ता. नगर) यांनी एका व्यक्तीने कृषी विभागाच्या योजना आणि अनुदानाच्या नावाखाली त्यांच्याकडून प्रत्येकी दीड हजार रुपये लाटले आहेत. प्रत्यक्षात जिल्हा परिषद कृषी विभागात अशी कोणतीच योजना अथवा अनुदान आम्हाला मंजूर झालेले नाही. यामुळे संबंधित व्यक्तीने आमची आर्थिक फसवणूक केली असून त्याच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्याचा आधार घेत कृषी विभागाने पोलिसांत तक्रार दिली आहे.