अकोले (प्रतिनिधी) -
निळवंडे डाव्या कालव्याच्या कामाविरोधात काही शेतकर्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ‘स्टे’
उठविल्याने कुंभेफळ येथे बंद असलेले डाव्या कालव्याचे काम प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत काल शुक्रवारी सुरू झाले.याशिवाय तालुक्यातील निंब्रळ, मेहेंदुरी,खानापूर,रेडे, या गावांमध्येही काही शेतकर्यांनी बंद पाडलेली कालव्याची कामे प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर याच आठवड्यात पुन्हा सुरू झाली आहेत.
तालुक्यातील कुंभेफळ येथील सीताराम कोंडाजी कोटकर, सदाशिव कोंडाजी कोटकर व किसन रामचंद्र कोटकर या शेतकर्यांची एकूण आठ एकर जमीन आहे. त्यातील तीन एकर जमीन ही निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या कामात जात आहे. सध्या डाव्या कालव्याचे ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यापद्धतीने काम सुरू राहीले तर या शेतकर्यांना जमीनच शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केलेली होती.त्याप्रमाणे न्यायालयाने निळवंडे डाव्या कालव्याच्या कामाला स्थगिती दिली होती.
त्यामुळे या निर्णयाविरुद्ध जलसंपदा कालवे विभाग न्यायलयात गेला होता त्यावर गुरुवारी न्यायालयाने सदर शेतकर्यांना दिलेली ‘स्टे’ ऑर्डर रद्द केली.त्यामुळे शुक्रवारी सकाळीच प्रांताधिकारी शशीकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे,पोलीस निरीक्षक अभय परमार ,कालवा विभागाचे श्री माने हे फौज फाट्यासह कुंभेफळ शिवारात दाखल झाले व त्यांनी जमीनीचा ताबा घेत कालव्याच्या कामाला सुरुवात केली.दरम्यान संबधित शेतकर्यांनी सामंजस्याची भूमिका घेत आम्हाला आमची उर्वरित जमीन मोजून द्या ,कालव्याच्या कामाला आमची कोणतीही अडचण नाही असे अधिकार्यांना सांगितले.
याशिवाय मेहेंदुरी येथील वाळके वस्ती,मेहेंदुरी फाट्याजवळ आरोटे वस्ती,खानापूर येथील ठाकरवाडी जवळ,रेडे येथे आकाश हॉटेल समोर तसेच कुंभेफळ येथे वाद सुरू होता. या आठवड्यात प्रांताधिकारी डॉ मंगरुळे ,तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तेथे जाऊन संबधित मूळ शेतकर्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या समजून घेतल्या,त्यावर मार्ग काढला.शेतकर्यांच्या सहकार्याने या गावांत कामे सुरू झाली.अकोले तालुक्यातील निळवंडे धरण ते कळस खुर्द या डाव्या कालव्याची जेथे कोणतीही खोदाई ची कामे सुरू झाली नव्हते.तेथे सामोपचाराने मार्ग काढला.कामातील बहुतांश अडचणी दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे.त्यामुळे या गावांत कालव्यांची कामे सुरू आहे.-करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्या
नंतर सर्व यंत्रणा घेऊन शेतकर्यांना मोजणी करून देऊ असे आश्वासन प्रांताधिकारी यांनी शेतकर्यांना दिले.या कामी तहसीलदार कांबळे,कालवा विभागाचे श्री. माने, मंडलाधिकारी कुलकर्णी, बाबासाहेब दातखिळे, तलाठी प्रमोद शिंदे आदीनी सहकार्य केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक व जेवण शेतातच
अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील काही शेतकर्यांनी निळवंडे डाव्या कालव्याचे काम बंद पाडले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी कुंभेफळ येथे प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे, तहसीलदार मुकेश कांबळे व अन्य अधिकारी सकाळ पासूनच कुंभेफळ येथे ठाण मांडून होते. संबधित शेतकर्यांशी चर्चा करत पुन्हा काम सुरु करण्यात आले. याच दरम्यान जिल्हाधिकारी यांची करोना नियंत्रण मिटिंग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे द्वारे पूर्ण करून इतर अधिकार्यांसोबत दुपारचे जेवण देखील प्रांताधीकार्यांसह तहसिलदार व अन्य अधिकार्यांनी शेतातच घेतले.