शिर्डी (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेली टीका राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांना एवढी बोचली असेल तर कोव्हीड संकटात केलेल्या मदतीची श्वेतपत्रिका महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Govt) काढावी, अशी मागणी भाजपाचे (BJP) नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. आपले अपयश झाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या भाषणाबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम करणारे आघाडी सरकार कोव्हीड (COVID19) संकटात कुठे होते? असा सवालही उपस्थित केला.
आ. विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य कुठेही महाराष्ट्राच्या विरोधात नाही. कोव्हीड संकटात राज्य सरकार कोणत्याही समाज घटकाला मदत करु शकले नाही. आपल्यावरची जबाबदारी टाळण्यासाठीच राज्यातील परप्रांतीय कामगारांना पाठवून देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतला ही वस्तुस्थिती असल्याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, जे काँग्रेस नेते आज प्रधानमंत्र्यांवर टीका करीत आहेत ते या संकटाच्या काळात फक्त मुंबईत (Mumbai) बसून राहीले. फेसबुकवर संवाद साधत होते. रोज माध्यमांपुढे येऊन पोपटपंची करणाऱ्या संजय राऊतांनी किती कोव्हीड सेंटर उभारले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुणे येथे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजीत आणि आघाडी सरकार पुरस्कृतच होता, असा थेट आरोप करतानाच भ्रष्टाचाराच्या विरोधातील ही लढाई थांबणार नाही, किरीट सोमय्याही शांत बसणार नाहीत. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या १२ निलंबीत आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सरकारला फटकारले, केंद्री मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना झालेली अटक आणि आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांना होत असलेला त्रास पाहता सत्तेचा केवळ गैरवापर सुरु आहे. मात्र विरोधकांना नामोहरम करण्यात आघाडी सरकार यशस्वी होणार नाही, असे स्पष्ट आ. विखे पाटील यांनी केले.
स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना संपूर्ण जगातून श्रध्दांजली वाहत होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व कार्यक्रम रद्द करुन, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत आले. मात्र काँग्रेसचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता. यावर भाष्य करताना आ. विखे पाटील म्हणाले की, सत्तेसाठी लाचार झालेली काँग्रेस लतादिदींचा स्वरही विसरली असा टोला त्यांनी लगावला.
महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात एकही कोव्हीड सेंटर सुरू नव्हते
महसूलमंत्री आज प्रधानमंत्र्यांवर टीका करतात, परंतु त्यांच्या तालुक्यात एकही कोव्हीड सेंटर सुरू होऊ शकले नाही, ४६ खासगी रुग्णालयांना परवानगी देऊन नागरिकांना वाऱ्यावर सोडले. स्वत: चे अपयश झाकण्यासाठी केंद्रावर टीका करण्याची फॅशन झाल्याचे टीकास्त्र आ. विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर केली.
काँग्रेसच्या पाठित खुपसलेला खंजीर विसरलात का?
राष्ट्रवादीच्या (NCP) खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेमध्ये व्यक्त केलेल्या टीकेवर प्रथमच भाष्य करताना आ. विखे पाटील म्हणाले की, खा. सुप्रिया सुळे यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा होता. स्व. राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी पक्षात घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री केले, त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून वेगळा पक्ष काढल्याचे काळाच्या ओघात तुम्ही विसरलात का? असा प्रश्न करतानाच खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी जो नेमका प्रश्न लोकसभेत (Lok Sabha) उपस्थित केला त्या राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या विक्रीबाबतही त्यांनी बोलले पाहिजे.