सुपा |वार्ताहर| Supa
नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे, सुलतानपूर येथे मादी बिबट्याच्या दहशतीने शेतकरी महिला, मुले याचे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. असे असतानाही वनविभाग पिंजरा लावण्यास गंभीर नसल्याने ऐन खरीप हंगामातील पिकांच्या काढणीच्या काळात शेतकरी हैराण झाले आहेत.
पारनेर तालुक्यातील म्हसणे, सुलतानपूर येथे दहा दिवसांपासून एक मादी बिबट्या आपल्या पिलांसह उसात वास्तव्यास असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दररोज वन विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क करत असून त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती सरपंच डॉ. विलास काळे यांनी दिली. गेली दहा दिवसांपासून वाघीण पिलांसह म्हसणे येथील ऊस असलेल्या शेतात दबा धरून बसलेली आहे. रात्रीच्या वेळी ती शिकारीसाठी बाहेर पडते. आतापर्यंत शेजारील वस्तीवरील दोन शेळ्या या वाघीणीने फस्त केल्या.
तसेच शिकार न मिळाल्यास कुत्र्यांवर हल्ला करत आहे. रात्रीच्यावेळी म्हसणे पारनेर रस्त्यावरून प्रवास करणार्या तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा वाघीणीला पाहिल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ दिवसांपूर्वी वनविभागास पिंजरा लावण्यासाठी अर्ज ही केला आहे. परंतु वनविभागाची अजून काहीच हालचाल दिसत नसल्याने उपसरपंच तरटे यांनी नाराजी व्यक्त केली. रात्रीच्या वेळी फटाके वाजवून संरक्षण करण्याचा उपाय दररोज येथील नागरिक करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सध्या शेतीमध्ये मूग, वाटाणा याची काढणी सुरू आहे. परंतु या मादीच्या दहशतीमुळे शेतकर्यांची कामे थांबली आहेत.