<p><strong>कोपरगाव |तालुका प्रतिनिधी|Kopargav</strong></p><p>आमदार पदाचा गैरवापर करून तीन वर्षे नगरपरिषदेला निधी मिळू न देता विकास कामांत खोडा घालणारे आता मीच विकास कामात खोडा घालत असल्याचा खोटा आरोप करत आहेत. </p>.<p>वास्तविक पाहता माजी आमदार कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव, नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव, पंचायत समितीतील पराभव अशा बहुतांश ठिकाणच्या सत्ता गेल्याने असंतुष्ट आत्मे आपल्या नगरसेवकांच्या मार्फत शहर विकासामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.</p><p>पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परीषदेत नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, पालिकेत नुकतीच स्थायी समितीची बैठक झाली. ही बैठक सुरू असताना संजीवनीचे दोन दूत दरवाजाबाहेर उभे होते. त्यांना ऐकू जावे म्हणून बालिश उपनगराध्यक्ष मोठ- मोठ्याने ओरडत होते. मी नगराध्यक्ष झाल्यापासून चार वर्षांच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासाची कामे केली आहे. </p><p>कोपरगाव शहरासाठी आलेला निधी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवण्यासाठी नसून शहर विकासासाठी आहे. याआधीच्या मुख्याधिकार्यावर दबाव असल्याने त्याकाळात आत्ताचे मुख्याधिकारी यायच्या आधी 2018 मध्ये सहा कोटी रुपये न वापरल्याने शासनाकडे परत गेले. याला जबाबदार कोण? फिक्समधील पैसे प्रभागातील विकास कामांसाठी वापरले आहेत. </p><p>शहरातील महत्त्वाचे रस्ते करण्याच्या कामात कोल्हे गटाने केवळ श्रेयवाद डोक्यात ठेवूनच अडथळे आणले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीमधील विषय का नामंजूर करायचे याचे उत्तरही सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना देता आले नाही. केवळ संजीवनीच्या गडावरून आदेश आल्याने भाजपा नगरसेवकांनी विषय नामंजूर केले. </p><p>येवला, संगमनेर व बाहेरील ठेकेदारांच्या निविदा मंजूर होण्याची शक्यता असल्याने कोल्हे गटाचे नगरसेवक आपल्या हाताखालच्या ठेकेदारांना ही कामे मिळाले नाहीत व मलिदा मिळणार नाही म्हणून अस्वस्थ आहेत. आजही 95 टक्केपेक्षा जास्त ठेकेदार कोल्हे यांच्या जवळचे आहेत. कोपरगाव नगरपरिषद शहरात स्वच्छता ठेवते की नाही हे जनतेला माहीत आहे. यापूर्वी फक्त तिजोरी साफ व्हायची पण आता शहर स्वच्छ होते हे सर्वांना दिसत आहे. </p><p>माझ्यावर आरोप करणारे काहीजण मला खाजगीत भेटून सांगतात की आमचे तुमच्याबद्दल काहीच म्हणणे नाही फक्त पार्टीचा आदेश म्हणून नाईलाजाने बोलावे लागते. अतिक्रमण करणारे त्यांना पाठीशी घालणारे, अनेक वर्षे नगरपरिषदेत लूट करणारे, विस्थापितांना वेड्यात काढणारे, ठेकेदाराला पुढे करून पडद्याआडून काम करणारे, ठरावीक ठेकेदाराला काम द्या असा आग्रह धरणारे, शहरात बेकायदेशीर आतिक्रमण करणारे, पूर्वी 23 दिवसाड पाणी देणारेच आज माझ्यावर आरोप करत आहेत. बहुतांश ठेकेदार कोल्हे यांचेच आहेत. त्यांना विचारून बघा शहरात विकास झाला की नाही? असेही नगराध्यक्ष वहाडणे शेवटी म्हणाले.</p>.<div><blockquote>कोपरगाव एका महिन्यात धूळ मुक्त होऊ शकते, अशा सोशल मीडियाद्वारे गप्पा मारणार्यांनी आपणही आपल्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये अध्यक्षपदाच्या खुर्चीची ऊब घेतली आहे. त्यावेळी का नाही कोपरगाव धूळ मुक्त झाले, असा टोला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे नाव न घेता लगावला.</blockquote><span class="attribution"></span></div>.<div><blockquote> शहरातील जनतेला आरोग्य,पाणी आणि रस्ते महत्त्वाचे आहेत. कोपरगाव शहर एका महिन्यात धूळमुक्त होऊ शकते मात्र पालिका रस्त्यावर मुरूम टाकून पाणी मारत आहे त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढत आहे. शहरात अनेक सिमेंटचे रस्ते केले मात्र ते निकृष्ठ दर्जाचे आहेत. धारणगाव रोड, गांधीनगर रोड, साई कॉर्नर, गुरुद्वारा रोड ह्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. पालिका हे खड्डे देखील बुजवण्याचे कष्ट घेत नाही हे दुर्दैव आहे. </blockquote><span class="attribution">- मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष.</span></div>