
राहाता | तालुका प्रतिनिधी
बिगर मोसमी पाऊस आणि सोबत गारा! राहाता तालुक्याच्या पूर्व भागात 5 मिनिटांच्या या नैसर्गिक आपत्तीने द्राक्षे, डाळिंब, कांदा, गहू, हरबरा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. या गाराच्या पावसाने चितळी, जळगांव, वाकडी चांगदेवनगर या पट्ट्यात पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातही इतरत्र पावसाने किरकोळ हजेरी लावली.
पावसाचे वातावरण नसतांनाही आज दुपारी 2.30 वाजेनंतर पावसाचे आगमन झाले. हरबऱ्याच्या आकाराच्या गारा पडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले. राहत्याच्या पूर्व भागातील वाकडी, चितळी, जळगांव, गणेशनगर, एकरूखे, रांजणगाव, पुणतांबा भागात हे चित्र दिसून आले.
राहाता भागात ही पावसाने हजेरी लावली. या पावसाने द्राक्षे उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. बागांवर द्राक्षे लगडले आहेत. महिन्या दोन महिन्यात द्राक्षे काढणीस येणार असल्याने गारपीट झाल्याने रोग आणि दर्जा घसरू शकतो. त्यामुळे हातांच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागा अडचणीत येणार आहेत. अवेळी पडणारा पाऊस व गारा यामुळे उभी पिके धोक्यात आली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.