
आश्वी |वार्ताहर|Ashwi
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल काळूबाई ओढ्यालगत वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यातच शुक्रवारी भर दिवसा बिबट्याने शेळी ओढून नेल्यामुळे बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने बदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
आश्वी सह पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील काही दिवसापासून बिबट्याबरोबरच तरसाचा वावर वाढल्याने मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पानोडी - साकूर रस्त्यावरील काळूबाईच्या ओढ्यालगत रस्ता पार करत असलेल्या तरसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारत शेवाळे यांनी वनविभागाला कळवल्यानंतर कर्मचार्यांनी येऊन तरसाला आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान शुक्रवारी भर दुपारी कदम वस्तीलगत असलेल्या तळ्याशेजारी संकेत जालिदंर शिंदे हा तरुण शेळ्या चारत होता. यावेळी बिबट्याने थेट शेळ्याच्या कळपात शिरुण एक शेळी ओढूण नेण्याचा प्रयत्न केला. परंतू शिंदे याने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेळी तेथेचं टाकून झुडूपात धूम ठोकली. यावेळी शेळ्याचा कळप बिचकल्यामुळे शिंदे हे सर्व शेळ्या एकत्र आणण्याचे काम करत असताना बिबट्याने त्यांची नजर चुकवून हल्ला केलेली शेळी घेऊन पलायन केले होते. त्यामुळे या परिसरात पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.