वांबोरीत ‘गाव तेथे होमक्वारंटाईन’ योजना प्रशासनामुळेच बारगळली

100 पैकी अवघे चारच रूग्ण, तेही दोन तासातच पसार झाले
वांबोरीत ‘गाव तेथे होमक्वारंटाईन’ योजना प्रशासनामुळेच बारगळली

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वाढत्या करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी ‘गाव तिथे होमक्वारंटॉईन’ अशी संकल्पना राबविण्यात आली आहे. मात्र, वांबोरी येथे ही संकल्पनाच कुचकामी ठरली आहे. वांबोरी गावामध्ये महेश मुनोत विद्यालयात गेल्या आठ दिवसापासून बाधित रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली.

या परिसरामध्ये आठ दिवसात किमान शंभर रूग्ण करोनाबाधित आहेत. मात्र, या सेंटरमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके असलेले रूग्णही दोन तासानंतर गायब झाल्याने त्याचे गौडबंगाल वाढले आहे. हे सर्व रूग्ण नेमके गेले तरी कुठे? याबाबत दस्तुरखुद प्रशासनच अनभिज्ञ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वांबोरीतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

महेश मुनोत विद्यालयामध्ये गेल्या तीन-चार दिवसापूर्वी तीन ते चार रूग्ण दाखल झाले होते. त्यांच्या देखभालीसाठी या ठिकाणी चार ते पाच कर्मचारी तेथे रात्रंदिवस काम करीत आहेत. परंतु हे रूग्ण ज्या दिवशी दाखल झाले, त्याच दिवशी दोन तासात पुन्हा या ठिकाणाहून निघून गेले आहेत. आठ दिवसात शंभर रूग्ण करोना पॉझिटिव्ह निघत असतील तर राहुरी महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस खाते नेमके करते तरी काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मागीलवर्षी करोनाची लाट आली त्यावेळी तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी मात्र जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांना जबरदस्तीने होम क्वॉरंटाईन केले होते. त्यामध्ये चुकून एखादा रूग्ण बाधीत सापडत होता. मात्र, यावेळी करोनाचे रुग्ण वाढत असतानासुद्धा प्रशासन मूग गिळून बसल्याने ठोस कारवाई करीत नसल्यामुळे करोनाचे रुग्ण वाढत असल्याची भिती नागरिक व्यक्त करीत आहेत.

वांबोरीतच या योेजनेला खीळ बसल्याने आता राहुरी तालुक्यातील कुठल्याही गावांमध्ये करोनाला आळा बसेल की नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने आपले कर्तव्य बजावले तर आठ दिवसात करोना राहुरी तालुक्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नसल्याचे ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत. आता तरी आरोग्य खाते, महसूल विभाग व पोलीस खाते जनतेचा जीव वाचविण्यासाठी पुढे येतील की नाही? अशी शंका ज्येष्ठ नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

राहुरी तालुक्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये बळींची संख्याही मोठी आहे. अनेक गोरगरीबांचे कर्ते माणसं यात बळी गेले असल्यामुळे त्यांचे प्रपंच उघड्यावर पडलेले आहेत. हे सर्व सावरण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य खाते व पोलीस प्रशासन जागे होईल का?अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com