
करंजी |प्रतिनिधी| Karanji
पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभूळगाव येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावासाठी प्रशासनाने तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा असा लेखी प्रस्ताव ग्रामपंचायतीने दोन महिन्यापूर्वी पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडे दिलेला आहे परंतु तो अध्यापही धुळखात पडला आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरीदेखील तालुक्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. शेतकर्यांच्या विहिरी शेततलाव, पाझर तलाव कोरडेठाक आहेत. पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनलेला आहे. अशा परिस्थितीत वैजू बाभळगावसह अनेक गावांमध्ये आता पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. तहसीलदार, पंचायत समितीने देखील वैजूबाभळ गावच्या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केलेले असले तरी नको ग्रामस्थांचा रोष अंगावर ओढून घ्यायला म्हणून पदरमोड करून दररोज बावीस हजार लिटर क्षमतेच्या खाजगी टँकर द्वारे पाणी विकत घेऊन गावाला पाणीपुरवठा करण्याचे काम गावच्या सरपंच उपसरपंच व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य करत आहेत.
इतरही अनेक गावात पाणीटंचाई आता निर्माण झालेली असून प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात व जनावरांच्या चार्याच्या संदर्भात कधी संवेदनशील होणार असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत. तालूका प्रशासनाने तात्काळ पाणीसाठा पहाणी करून टँकरचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी सरपंच ज्योती घोरपडे, उपसरपंच रावसाहेब लोहकरे, सदस्य मनेष घोरपडे, प्रतीक घोरपडे, सोपान गुंजाळ, भरत घोरपडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.