
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, वर्धा, नंदूरबारमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.
जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारपासूनच ढगाळ हवामान होते. काल श्रीरामपूर शहरासह तालुक्यात विविध भागात अधूनमधून सरी कोसळत होत्या. त्यामुळे रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला होता. राहाता, कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहुरी, नगर, श्रीगोंदा तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी गावात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने हे झाड पेटले होते. आज शुक्रवारीही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शनिवारी यलो अलर्ट आहे.
हवामान विभागाने राज्यात 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. विशेषत: फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानंतर काही शेतकर्यांनी काढणीस आलेला गहू, हरभरा आणि कांदा पीक जमेल तसा काढून सुरक्षित ठिकाणी ठेवला. पण अनेकांचे या पावसाने नुकसान झाले आहे.