
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वाद झाल्याने तक्रार दाखल करण्यासाठी आलेले दोन गट तोफखाना पोलीस ठाण्यातच भिडले. त्यांच्यातील वादामुळे पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या लोकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद दाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी ही घटना घडली. अनिल कचरू वाकचौरे (वय 36), सुनील कचरू वाकचौरे (वय 26), सुवर्णा अनिल वाकचौरे (वय 27), स्वाती सुनील वाकचौरे (वय 23, सर्व रा. एस. टी. वर्कशॉपसमोर, रामवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वरील चौघे मंगळवारी दुपारी लहानमुलांचे खेळण्याचे कारणावरून झालेल्या वादाची परस्परविरोधी फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आले होते.
तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होताच त्या दोन गटात वाद झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. त्यानंतर त्या दोन्ही गटाच्या लोकांनी आम्हाला तक्रार द्यायची नाही, असे म्हणून निघून जात असताना पोलीस ठाण्याच्या गेटवरच सुवर्णा व स्वाती यांच्यात पुन्हा वाद होऊन हाणमार करू लागल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.