<p><strong>नेवासा (तालुका वार्ताहर) -</strong> </p><p>कल्याण औरंगाबाद बसने प्रवास करत असताना 3 जानेवारी रोजी दुपारी बसमध्ये बसलेल्या महिलांनी गंगापूरच्या प्रवासी महिलेच्या बॅगमधील</p>.<p>5 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या डब्यासह 20 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घोडेगाव ते नेवासाफाटा या दरम्यान घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p><p>याबाबत सिंधूबाई लक्ष्मण खाजेकर (वय 65) रा. लासूर नाका, गंगापूर जि. औरंगाबाद या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मी 3 जानेवारी रोजी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मी व माझा नातू विराज असे कल्याण ते औरंगाबाद एसटी बसने (एमएच 14 बीटी 3031) गंगापूर येथे येण्यासाठी निघालो. दुपारी साडेबारा च्या दरम्यान घोडेगाव येथून सदर बसमध्ये चार स्त्रिया व त्यांचे लहान मुल असे माझ्या शेजारी येवून उभ्या राहिल्या. त्यापैकी एक माझ्या शेजारी येवून बसली. तिच्याजवळ लहान दोन ते तीन महिन्याचे बाळ होते. त्यापैकी एक महिला माझ्या बॅगजवळ खाली बसली. सदर स्त्रिया नेवासाफाटा येथे आल्यानंतर बसमधून उतरुन गेल्या. त्यानंतर मी औरंगाबाद हायवे रोडवर गंगापूर फाटा येथे माझी बॅग घेवून नातू विराज याचेसह उतरले. तेथून मी रिक्षाने माझ्या घरी गंगापूर येथे गेले.</p><p>घरी गेल्यावर बॅगेतील सामान बाहेर काढत असताना बॅगेच्या आतमधील बाजूस ब्लेड मारल्यासारखे फाटलेले दिसले. मी बॅगेत ठेवलेल्या प्लॅस्टीक डब्याच शोध घेतला असता तो मिळाला नाही. तसेच 20 हजार रुपये ठेवलेली प्लॅस्टीकची पिशवी मिळून आली नाही.</p><p>डब्यामध्ये तीन तोळ्याची सोन्याची पोत, 7 ग्रॅम सोन्याची एकदाणी, 4 ग्रॅम सोन्याचे धम्मचक्र, 5 ग्रॅमची सोन्याची बदाम आकाराची अंगठी, दोन ग्रॅमची रिंगची सोन्याची अंगठी तसेच दोन ग्रॅम सोन्याचे खरबुजे मणी असे 5 तोळे सोन्याचे दागिने होते. हे दागिने तसेच प्लॅस्टीक पिशवीतील 20 हजार रुपये हे सर्व चोरीस गेले.</p><p>या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ कुंडारे करत आहेत.</p>