राहाता (प्रतिनिधी) - स्थानिक राजकारणामुळे गेल्या 17 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तहसिलच्या धान्य गोडावूनमध्ये बंदिस्त आहे. शिवसेनेने अनेकदा या संदर्भात विविध आंदोलने केली. मात्र अद्याप पुतळा बंदिस्त आहे. छावा क्रांतीवीर सेना संघटनेने याप्रश्नी राज्यपालांसह विविध मंत्र्यांना निवेदने दिली. त्यानंतर आ. आशुतोष काळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा राहाता येथील शिवाजी चौकात बसविण्यावरुन राजकारण सुरु आहे. प्रशासकीय यंत्रणेवर दबाव टाकून राहाता येथील तहसीलच्या धान्य गोडावूनमध्ये छत्रपतींचा पुतळा आजपर्यंत बंदिस्त ठेवलेला आहे. केवळ श्रेय वादावरुन राहाता नगरपरिषदेच्या निधीतून आणलेला पुतळा हा राहाता तहसिल मधील धान्य गोडाऊनमध्ये बंदिस्त केला आहे. राज्य सरकारने तात्काळ यात लक्ष घालावे, अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना संघटनेने राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील पुतळा हा तात्काळ गोडावुन मधुन मुक्त करुन राहाता नगरपरिषदेचे मध्यवर्ती ठिकाणी गार्डन व सुशोभिकरणाचे काम सुरु असून त्या ठिकाणी बसविणे योग्य होईल.
या संदर्भात कारवाई न झाल्यास 19 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजता राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ वाघ यांचेवतीने देण्यात आला आहे.
दरम्यान गुरूवारी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे, शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, नगरसेवक सागर लुटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गोडावूनमध्ये बंदिस्त असलेला पुतळा मुक्त करावा, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्यासोबत चर्चा केली असून शिष्टमंडळ जिल्हाधिकार्यांची भेट घेणार असल्याचे पठारे यांनी सांगितले.