
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
ठाणे जिल्ह्यातून (Thane District) शहापूर (Shahapur) तालुक्यातील गांढुळवाड, तळवाडा, हिंगळूद मेट ते चोंढे घाटमार्गे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) घाटघरवाडी, भंडारदरा (Bhandardara), शेंडी, मुरशेत या भागाला थेट जोडणार्या रस्त्याच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Department of Public Works) प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
या रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण (Survey) करण्यासाठी 1 कोटी 75 लाखांचा खर्च करून या प्रकल्पाचा अहवाल (Project Report) तयार करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ठाणे-अहमदनगर (Thane Ahmednagar) हे शेजारी असलेले जिल्हे रस्त्याच्या मार्गाने जोडून 60 किमी लांबीचा वळसा दूर करण्यात येणार असून हे अंतर 6 किमीवर येणार आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी मागणी करणार्या स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि आदिवासींना दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात जाण्यासाठी मुरबाडहून माळशेजमार्गे (Malshej) व शहापूरहून कसारा घाटातून नाशिकमार्गे जावे लागते. शहापूरहून नगरकडे जाताना 60 किमीचा मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेचा अपव्यय होतो. प्रवासाचा खर्च वाढतो. त्या तुलनेत शहापूर-शेणवा-डोळखांब-भंडारदरा-राजूर-अकोले-संगमनेर हा प्रस्तावित मार्ग असून यामुळे हे अंतर 6 किमीमध्ये पार करता येणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा केला जात आहे.
परंतु सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. यापूर्वी सन 2013-14 मध्ये या रस्त्याचे सरकारी स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले होते. शहापूर ते अकोले अशा एकूण 120 किमीपैकी सुमारे 6 किमीचा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने वन विभागाच्या जागेबाबत सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. कागदोपत्री दोन्ही बाजूंनी दिसणारा हा रस्ता चोंढे ते शहापूर व शेडी ते घाटघर असा अर्धवट स्थितीत आहे.
घाटमाध्यावर जोडणी मिळून रस्ता मार्गी लागण्यास दिरंगाई होत आहे. यासंदर्भात स्थानिकांकडून पाठपुरावा केल्यानंतर आता गांडुळवाड, तळवाडा, हिंगळूद, मेट ते चोंढे घाटमार्गे नगर जिल्ह्यातील घाटघर, भंडारधरा शेंडी, मुरशेत या मार्गाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात व्यवहार्यता तपासण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया, कोणत्याही पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बाधा न आणता हा रस्ता पूर्ण करण्यासंदर्भातील कामांचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यटन विकासाला मोठी चालना
चोंढे धरण, कोकणकड्याचे विहंग धबधबे, घाटघर धरण, सांधण व्हॅली, अलंग, कुलंग, कळसुबाई शिखर, भंडारदरा, अशा अनेक पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरू शकणार आहे. मुंबई-ठाण्यातून पायी शिर्डीला जाणार्या यात्रेकरूंसाठीही हा मार्ग सोयीचा असेल. सध्या शिर्डीला पायी जाण्यासाठी आठ ते नऊ दिवस लागतात. हा मार्ग झाल्यास पाच दिवसांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हा मार्ग या भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी सांगितले.