टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
जलसंपदा विभागाने शेतीच्या आर्वतनातुन योग्य नियोजन करुन टाकळीभान ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेले महादेव गावतळे तसेच घुमनदेव रस्त्यालगतचे अशोक बंधारे पुर्ण क्षमतेने भरुन दिल्यानेे या परीसरातील नागरीकांमध्ये ऐन उन्हाळ्यात घशाची कोरड कमी होणार असल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.
उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पाणी टंचाईची समस्या जाणवू लागल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. घुमनदेव रस्त्यालगतच्या परीसरात पाटपाणी पोहचत नसल्याने या परीसरातील पिके नाल्याच्या पाण्यावर आवलंबुन असतात. या नाल्यावर ठिकठिकाणी अशोक बंधारे तयार केलेले आहेत.
त्यामुळे हे बंधारे भरले गेल्यास शेतीच्या पाण्यासह वाड्या वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होत असते. सध्या टाकळीभान टेलटँकमधुन शेती आवर्तन सुरु असल्याने टाकळीभानला पाणीपुरवठा करणार्या महादेव गावतळे पुर्ण क्षमतेने भरण्यात आले. त्यासोबतच नाल्यावरील अशोक बंधारे भरण्यासाठी पाणी सोडून सर्व बंधारे पुर्ण क्षमतेने भरण्यात आले.