सुपा |वार्ताहर| Supa
पारनेर तालुक्यातील सुपा वाळवणे रस्त्यालगत असलेला डोंगर गुरुवारी पहाटे अज्ञात व्यक्तिंनी पेटवून दिल्याने हजारो झाडे आगिच्या लोटाने होरपळून निघाली आहेत.
सुपा वाळवणे रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनिकरण विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. या झाडांच्या देखभालीसाठी वाळवणे ग्रामपंचायतीमार्फत तीन वर्षांसाठी मजूर लावण्यात आले आहेत.
या मजूरांच्या वतीने झाडांना पाणी देणे, झाडा लगत असलेल्या गवताची खुरपणी करणे तसेच झाडांची निगा राखणे आदी कामे केली जातात.दोन वर्षात झाडांची वाढ देखील चांगल्या प्रकारे झाली. मात्र हे अज्ञात व्यक्तिंना देखावले नसल्यामुळे भल्या पहाटे डोंगर पेटवून दिला. यादरम्यान वारे मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यालगत व डोंगरावर असलेले हजारो झाडे आगिच्या भक्षस्थानी राहिल्याने सामाजिक वनीकरण विभागा मार्फत दोन वर्षांत लाखो रुपये केलेला खर्च पाण्यात गेला आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सुपा परीसरात मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावर लाखो रुपये खर्च केले जातात मात्र नियोजनाचा अभाव असल्याने हजारो झाडे शेवटच्या घटका मोजत आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने निधी दिला जातो. पाऊस उघडल्यानंतर सहा महिने होऊन गेले अद्याप झाडांना पाणी न मिळाल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत.
तर वाळवणे रस्त्यालगत असलेले झाडे आगीत होरपळून निघाली आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. हा डोंगर दरवर्षी पेटवून दिला जातो. जाणिवपूर्वक पेटवून दिला जातो की समाजकंटकांच्या वतीने पेटवला जातो हा विषय न उलगडणारा असला तरी यामध्ये हजारो झाडे जळून नष्ट होतात व पर्यावरणाची कधीही न भरून निघणारी मोठी हाणी होते याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होताना दिसते.