<p><strong>सुपा |वार्ताहर| Supa</strong></p><p>पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत मतदार यादीत परप्रांतियांची नावे आहेत. ही नावे मतदार यादीतून काढून टाकावीत, </p>.<p>अशी मागणी मनसेच्यावतीने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राव्दारे करण्यात आली आहे.</p><p>पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे 91 परदेशी व परप्रांतिय नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. हे मतदार मोकळ्या जागेत झोपडपट्टी बांधून राहत असून त्याचे दर सहा महिन्यांनी स्थलांतर होत असते. </p><p>त्यांना राजकीय आधार मिळाल्याने बोगस आधार कार्ड व रेशन कार्ड मिळालेले असून त्या आधारावर सुपा-वाळवणे रस्त्यालगत गट नंबर 42 मध्ये ‘क’ च्या स्वरूपाची पाल तंबू असा निवारा बांधून राहत आहेत. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ निवडणुकीत मतदानाच्या हव्यासापोटी ही नावे घेतली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.</p><p>याबाबत ग्रामविकास अधिकारी यांनी सुद्धा पाहणी करून अहवाल सादर केला आहे. तसेच ही बोगस नावे असल्याचे निष्पन्न झाले, असा अहवाल पंचायत समिती सभापती यांना दिला होता. मात्र, त्यानंतरही नावे वगळण्यात आली नाहीत. नविन मतदार नोंदणी करताना 15 वर्षे रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो, तसा पुरावाही नावनोंदणी करताना नसल्याचे माहिती अधिकारात सिध्द झाले. </p><p>याप्रकरणी सामाजिक संघटनांनी तहसीलदारांना निवेदने दिली. त्यावरही ही नावे मतदान यादीतून वगळली नाहीत. पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीत यादी भाग नंबर 267 व 268 मध्ये आलेली 91 बोगस नावे रद्द करावीत, तसेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या बोगस नावे असणार्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना मनसेच्या वतीने करण्यात आली. </p><p>अन्यथा मनसेच्यावतीने निवडणूक विभागात आंदोलन करण्याचा इशारा अनिल चितळे, प्रदेश उपाध्यक्ष डी. एन. साबळे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, उपजिल्हाध्यक्ष मारुती रोहकले यांनी दिला आहे. दरम्यान, मनसेच्यावतीने इशारा देताच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ताबडतोब या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्याचे अश्वासन दिले असल्याचे मनसेच्यावतीने सांगण्यात आले.</p>