उंबरे |वार्ताहर| Umbare
संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल राहुरी तालुक्यातील वांबोेरी येथील प्रसाद शुगरच्या साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेऊन कारखाना बंद पाडण्याच्या प्रयत्न केला. काही काळ कारखाना बंद केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून गव्हाणीतून कार्यकर्त्यांना वर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी अनेक मागण्या साखर आयुक्तांच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारकडे केल्या आहेत.
या मागण्यावर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 17 व 18 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचे राज्यव्यापी ऊसतोड बंद करण्यासाठी लाक्षणिक अंदोनन पुकारले आहे त्यासाठी अ. नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या उसतोडबंद अदोलनासाठी सहकार्य करावे त्यांनी ऊसतोड कामगार, उसवहातुकदार तसेच शेतकर्यांवर दबाव टाकु नये अन्यथा हे दोन दिवसांचे लाक्षणिक अंदोलन सोडुन बेमुदत ऊसतोड बंद केली जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी जिल्ह्यातील सर्वच गळित हंगाम सुरू असलेल्या कारखान्यांना पत्राद्वारे दिला होता.
ऊसाला एफआरपी. पेक्षा 350 रुपये अधिक दर मिळावा, सर्व साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन करावे, साखरेचा दर 31 रुपयावरून 35 रुपये करावेत, साखर निर्यातीस अधिक परवानगी द्यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा बडगा उगारला आहे. काल सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील ऊस तोडी बंद करून रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहने आडवली होती. तर दुपार नंतर मात्र, हे आंदोलनकर्ते अधिक आक्रमक होवून, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रसाद शुगरच्या गव्हाणी मध्ये उड्या टाकत काही काळ बंद पाडला. अचानक कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या फेकल्याने कारखाना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना गव्हाणीतून वर काढले. परंतू आंदोलनकर्ते कारखाना बंद करण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, सतिष पवार, राहुल चोथे, जुंगल गोसावी, राहुल करपे, प्रमोद पवार, सचिन पवळे, प्रविण पवार, सचिन गडगुळे, बाबासाहेब शिंदे, सचीन पवार, सोमनाथ करपे, शुभम गोसावी, दत्तात्रय मोरे, सुनील नालकर, योगेश गोसावी, किरण मोरे, अमोल पवार आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद शुगरच्या ऊस गव्हाणीत उड्या घेतल्याने तेथील काही कर्मचार्यांनी कार्यकर्त्यांना शिविगाळ करीत शेतकरी आम्हाला स्वत: हून ऊस देतात. आम्ही शेतकर्यांच्या दारात ऊस मागणीसाठी जात नाही, तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर शेतकर्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा, असे खडेबोल सुनावले. त्यावेळी कार्यकर्ते व कर्मचारी यांच्यात झटापट झाल्याने काही गोंधळ उडाला.