साखर कामगार वेतनवाढ; त्रिपक्ष समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरु

साखर कामगार वेतनवाढ; त्रिपक्ष समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरु

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी स्थापन करण्यात येणारी त्रिपक्षीय समिती गठीत करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू झाल्याने साखर कामगारांसाठी हे दिलासादायक वृत्त आहे.

राज्यातील साखर उद्योगातील कामगारांना वेतनवाढ देणार्‍या त्रिपक्ष समिती व कराराची मुदत संपुष्टात येऊन 14 महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी सुद्धा समिती गठीत होत नसल्याने राज्यातील साखर कामगारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली आहे. 01 एप्रिल पासून राज्यातील साखर उदयोगातील कामगारांचे वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठीत करून कामगारांना नवीन 40 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा या मागणी विविध कामगार संघटनांनी केलेली आहे.

कामगार संघटनांनी एप्रिल 2019 मध्येच साखर कामगारांच्या मागण्याची नोटीस राज्य शासनाला दिलेली आहे. त्याला 16 महिन्याचा कालावधी उलटला तरीही शासन पातळीवर या मागण्यांबाबद कोणताच निर्णय झालेला नाही.त्यामुळे राज्यातील साखर कामगारमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.

त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी, साखर कामगारांना 40 टक्के वेतनवाढ मिळावी या आणि इतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही मागणी मागे पडली होती. राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या, सरकार ही स्थापन होऊन 6 महिन्यांचा कालावधी लोटला तरी सुद्धा साखर कामगारांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ मिळाला नाही.

आता तर करोना महामारीचे संकट उभे राहिल्याने साखर कामगारांच्या वेतन वाढीकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. या पार्श्वभूमीवर साखर कामगारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.

यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सन 2020-21 च्या गळीत हंगामासाठी राज्यात 10.66 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस लागवड झालेली आहे. या संपुर्ण ऊसाचे गाळप होण्यासाठी 185 ते 190 दिवस साखर कारखाने सुरू ठेवण्याचा अंदाज आहे.

येत्या हंगामात 190-195 साखर कारखाने सुरू होतील असा ही अंदाज आहे.गळीत हंगाम तोंडावर आलेला असतांना साखर कामगारांचा संप हा साखर उद्योगाला परवडणारा नाही.साखर कामगारांचा संप होऊ नये म्हणून त्रिपक्षीय समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

त्रिपक्ष समिती गठीत करून साखर कामगारांना 40 वेतनवाढ मिळावी,वेतनवाढीचा अंतिम निर्णय होई पर्यंत 5 हजार रुपये हंगामी वेतनवाढ लागू करावी या व इतर मागण्यांची नोटीस देऊन 16 महिन्यांचा कालावधी उलटला आहे,तरी सुद्धा शासन पातळीवर याबाबद कोणताच निर्णय झालेला नाही.त्यामुळे राज्यातील साखर कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.त्याचा परिणाम येत्या गळीत हंगामातील कामकाजावर होऊ होऊ शकतो. हंगाम सुरू होण्यापूर्वी त्रिपक्षीय समिती गठीत होऊन वेतनवाढीचा निर्णय झाला नाही तर मात्र संप अटळ आहे.

- नितीन पवार सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन

राज्यातील साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दि.20 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून साखर कामगारांच्या वेतना बाबदची माहिती तातडीने मागितली आहे.या परिपत्रकात संघाने म्हटले आहे की, त्रिपक्षीय कराराची मुदत संपली असून नवीन त्रिपक्षीय करार करण्यासाठी राज्यपातळीवरील कामगार संघटनांनी मागणी पत्र सादर केली आहेत.त्रिपक्षीय समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कारखान्यातील कामगारांचा सध्याची वेतन परिस्थितीचे अवलोकन होणार आहे. त्यासाठी राज्यातील साखर कारखान्यानी आपापल्या कारखान्यातील वेतना बाबदची माहिती तातडीने पाठवावी असे सूचित केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com