अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
किराणा दुकानदारांची तीन लाख रूपयांची रोख रक्कम असलेली बॅग दोन महिला आणि एक पुरूष चोरट्याच्या टोळीने रिक्षा प्रवासात चोरली. कृषी उत्पन्न बाजार समिती ते कोठला दरम्यान प्रवास करताना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी किराणा दुकानदार दिलीप नंदकिशोर बाहेती (वय 35 रा. चापडगाव ता. शेवगाव) यांनी मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चापडगाव येथील किराणा दुकानदारबाहेती हे तीन लाख रूपयांची रोख रक्कम घेऊन नगरला आले होते. बाहेती हे मंगळवारी दुपारी बाजार समिती चौकात रिक्षा (एमएच 16 बीसी 1874) मध्ये बसले. त्यावेळेस त्यांच्या शेजारी एक व्यक्ती बसला होता. रिक्षा ही क्लेरा ब्रुस विद्यालयाजवळ आली. त्यावेळेस दोन महिला आणि एक पुरूष रिक्षामध्ये बसला. रिक्षा कोठला भागात येईपर्यंत बाहेती यांची तीन लाख रूपये रक्कम असलेली बॅग चोरीला गेली. बाहेती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी दोन महिला आणि एक पुरूष अशा तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.