राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सुमारे 100 आदिवासी आश्रम शाळा लवकरच अत्याधुनिक करण्याचा मानस आहे. त्यासाठी केंद्राकडे निधीचीही मागणी केली आहे. ज्या शाळेत उद्योगपतींचे मुले शिक्षण घेतात, त्याचपटीत माझ्या आदिवासी बांधवांच्या मुलांना देखील उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, म्हणून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील पिंप्री-वळण-चंडकापूर येथे आदिवासी बांधवांना आदिवासी विभागाच्या माध्यमातून मोफत घरपोहोच जातीच्या दाखल्याचे वितरण नामदार तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. काल सकाळी पिंप्री येथील खंडोबा मंदिरासमोर सुमारे 85 दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे.ना.तनपुरे म्हणाले, राज्यामध्ये आदिवासी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्याने या विभागाचे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यामाध्यमातून या योजनांचा लाभ या बांधवांना केवळ जातीचा दाखला नसल्याने मिळत नसल्याचे लक्षात आले.
म्हणून या विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्वे करून प्राधान्याने जातीचे दाखले मिळवून देत आहोत. आता विषेशतः विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेऊन या दाखल्याच्या आधारे नोकरीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राहुरी मतदारसंघामधील आदिवासी बांधवांना विशेष तत्वाने वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पाठपुरावा या माध्यमातून केला जाणार आहे. पिंप्री-वळण येथील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेसाठी जागेची येणारी अडचण घेता, शासन स्तरावर या अडचणी सोडविण्यासाठी अधिकार्यांना ना. तनपुरे यांनी योग्य त्या सूचना केल्या आहेत.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे, माजी सरपंच ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट, युवराज पवार, यशपाल पवार, वैभव जरे, शिवाजी जाधव, अरूण खिलारी, बाळासाहेब शिंदे, मुकींदा काळे, प्रकाश आढाव, जालिंदर कानडे, विलास पुंड, दादासाहेब राजळे, बाबासाहेब डमाळे, दगडू साळवे, भगवान कानडे, आबासाहेब लहारे, शिवाजी डमाळे, रवींद्र गरूड, विष्णु पवार, शिवाजी जाधव, आप्पासाहेब गोलवड, जगन्नाथ जाधव, लखन कानडे, भागवत आगलावे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.