अकोले (प्रतिनिधी) -
विधानसभा निवडणुकीत नगर जिल्हयात पक्षाला चांगली साथ मिळावी. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या जिल्ह्याने साथ दिली.
आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नगर जिल्ह्यातील नेत्यांना दिला. सत्ता चालवताना अनुभवी लोक लागतातच, असेही पवार यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सीताराम गायकर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी अजितदादा बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार बाळासाहेब पाटील, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे आदी उपस्थित होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे,राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे,.तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे,.शहराध्यक्ष संपतराव नाईकवाडी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गायकर यांचे बरोबर अगस्ति कारखान्याचे संचालक प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे,अशोकराव देशमुख, कचरु पाटील शेटे,रामनाथ बापू वाकचौरे,बाळासाहेब ताजने, भास्कर बिन्नर, दूध संघाचे संचालक विठ्ठलराव चासकर, भाऊपाटील नवले, शरदराव चौधरी, बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, जि. प.चे माजी सदस्य कैलासराव शेळके,दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव देशमुख,,आनंदराव वाकचौरे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे, शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य आप्पासाहेब आवारी, मुरलीधर ढोन्नर, रोहिदास भोर,पुंजा पाटील वाकचौरे, माधवराव भोर,विकासराव शेटे,प्रकाश नाईकवाडी ,सुधीर शेळके,किसन शेटे, वसंतराव धुमाळ,रविद्र हांडे,सुभाष बेनके, आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे आहोत. फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या हिताचं काय? भावी पिढीच्या भवितव्याचं काय? हा विचार करा. काळजी करू नका अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचं नाही, असेही पवार यांनी सांगितले.
घटना घडत असतात. कोण जात असते कोण येत असते. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून आम्हाला संधी मिळाली. अठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्षपद पवारसाहेबांनी दिले. पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिले. त्यांच्याबरोबर अनेकांनाही दिली आणि ही पदे साहेबांमुळे मिळाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. वेगवेगळ्या प्रकारे मागण्या पूर्ण करण्याचे काम राष्ट्रवादीमय जिल्हा होता म्हणून काम केले.
आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय : जयंत पाटील
आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करत आहोत, असे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले.
शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिले. त्यामुळे 54 आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी गायकर यांना उद्देशून करताच एकच हशा पिकला. कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते, याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.गायकर यांनी जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यामुळे तालुक्यापुरती मर्यादित न रहाता जिल्हाकडेही त्यांनी लक्ष द्यावे,अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.