श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
करोनाच्या पार्श्वभुमीवर आठवडे बाजाराला अद्याप परवानगी नसल्याने शहरातील आठवडे बाजार बंदच राहणार असून व्यापारी व शेतकर्यांनी आजच्या आठवडे बाजारात भाजीपाला, फळ विक्री करू नये, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील शुक्रवार आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपला भाजीपाला व फळे शक्यतो हातगाडीवर रस्त्याने व गल्लीबोळातून विक्री करावा.
वरील नियमांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता 45/1860 च्या कलम 188 नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाईस तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 43 (1) मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.