श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यात 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी 98 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवसच शिल्लक राहिल्याने हे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यात 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारी 2021 रोजी होत असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरु आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या पाच दिवसात उमेदवारांची जात पडताळणी करण्यासाठी धावपळ उडाली. या पाच दिवसात केवळ पाच अर्ज दाखल झाले होते.
कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. काल सहाव्या दिवशी 27 ग्रामपंचायतींच्या 215 सदस्यासाठी 98 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कालपर्यंत एकूण 103 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 30 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन दिवस हातात आहेत.
या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धावपळ उडणार आहे. या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांबरोबरच त्यांचे कार्यकर्तेही त्यांचेसोबत राहणार असल्याने मोठी गर्दी होणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन दिवस पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार आहे.
27 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले नव्हते. कालपर्यंत केवय 10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 98 उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले आहेत. सराला, गोवर्धन, नायगाव, मातुलठाण, कुरणपूर, मांडवे, गळनिंब, ब्राम्हणगाव वेताळ, मातापूर, खानापूर, पढेगाव, गोंडेगाव, एकलहरे, भेर्डापूर, कारेगाव, महांकाळवाडगाव, वळदगाव या ठिकाणच्या एकाही जणाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत.
तर लाडगाव-7, निपाणीवडगाव-13, बेलापूर खुर्द -2, बेलापूर बुद्रुक-9, घुमनदेव-2, वडाळा महादेव-9, खोकर-20, मुठेवगाव-2, टाकळीभान 24, मालुंय बुद्रुक 10 असे 98 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.